Mumbai News : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करून देण्यासाठी गोरेगाव पश्चिमेकडील मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. शनिवारी याचं लोकार्पण पार पडलं. मात्र लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी उड्डाणपुलाचे तीन तेरा वाजल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल सात वर्षे या उड्डाणपुलाचं काम केलं जात होतं. या उड्डाणपुलासाठी तब्बल २४८ कोटींचा खर्च करण्यात आला. सात वर्षानंतर जो उड्डाणपूल उभा करण्यात आला त्याचं बांधकाम पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
२४८ कोटींचा खर्च केलेल्या उड्डाणपुलाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
गोरेगावमधल्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचं काम तब्बल सात वर्षानंतर पूर्ण झालं. मात्र उद्घाटनानंतर हा पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुलावर ओबडधोबड पृष्ठभाग आणि पॅचवर्क लावल्यासारख्या दिसणाऱ्या सांध्यावरुन टीका होत आहे. मुंबईकरांनी सोशल मीडियावरुन पुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
महापालिकेचं स्पष्टीकरण...
हा पूल वालभट नदी आणि ओशिवरा नदी या दोन नद्या ओलांडून जातो. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान पुलावरील रस्त्याचा थर पेनाने उखडत असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर उड्डाणपुलाचा कंत्राटदार, सल्लागार, अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या पॅचवर्कवरुन आता मुंबई महापालिकेनं स्पष्टीकरण दिलंय. पुलावरील दिसणारे सांधे हा निकृष्ट कामाचा नाही तर तांत्रिक प्रक्रियेचाच एक भाग असल्याचं म्हटलंय. पुलासाठी 40 मिलीमीटर जाडीचा मॅस्टिक अॅस्फाल्ट वापरण्यात आलाय. वाहतूक जसजशी वाढेल, तसा रस्ता सपाट होईल असं महापालिकेनं म्हटलंय.