Mumbai News : उत्तन-विरार सागरी मार्गाचा सुधारित, किफायतशीर आराखडा एमएमआरडीएकडून सादर; काय बदल करणार?

उत्तन-विरार सागरी मार्ग हा प्रकल्पाच्या विरार कनेक्टरमार्फत हा सेतू वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेशी थेट जोडला जाणार आहे, ज्यामुळे उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मार्ग अधिक जलद व कार्यक्षम होणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Mumbai News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उत्तन-विरार सागरी मार्ग (यूव्हीएसएल) चा सुधारित आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर प्रस्ताव आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला. यावेळी प्रस्तावित उत्तन विरार मार्ग वाढवण बंदर व समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावे. त्यामुळे हा सागरी मार्ग प्रकल्प मुंबईला महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  

प्रस्तावित उत्तन विरार सागरी मार्ग प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनातील मंत्रिमंडळ कक्षात झालेल्या या बैठकीत आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल आदी उपस्थित होते. 

उत्तन-विरार सागरी मार्ग हा प्रकल्पाच्या विरार कनेक्टरमार्फत हा सेतू वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेशी थेट जोडला जाणार आहे, ज्यामुळे उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मार्ग अधिक जलद व कार्यक्षम होणार आहे. हा प्रकल्प केवळ आर्थिक संधीच निर्माण करणार नाही, तर भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार आहे. हा प्रकल्प केवळ आर्थिक संधीच निर्माण करणार नाही, तर भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

(नक्की वाचा- Thane Borivali Twin Tunnel Project: ठाणे–बोरीवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांत, मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज! वाचा सर्व अपडेट)

Advertisement

सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती

सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर, एमएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवालासह प्रकल्प रचनेचे 87,427 कोटी रुपयांपासून ते 52,652 कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे प्रस्ताव असलेल्या सहा वेगवेगळ्या पर्यायांचे सादरीकरण आजच्या बैठकीत केले. त्यातून आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य, कार्यक्षम आणि पर्यावरण पूरक असलेला 52,652 कोटी रुपयांच्या पर्यायाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निवड केली. या पर्यायामुळे प्रकल्प खर्च 87,427.17 कोटी रुपयांवरून 52,652 कोटी रुपयांवर आणण्यात यश आले आहे. 

प्रकल्प खर्च कपातीमागील मुख्य कारणे 

लेन डिझाइनमध्ये योग्य ते बदल: पूर्वी 4+4 लेन आणि इमर्जन्सी लेन असा मोठा रस्ता ठेवला होता. आता तो 3+3 लेनवर आणला गेला आहे. कनेक्टरसाठीसुद्धा 3 + 3 + इमर्जन्सी ऐवजी फक्त 2+2 लेन ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिव्हिल आणि स्ट्रक्चरल कामांमध्ये खूप बचत झाली.

Advertisement

भविष्यातील जोडण्या लक्षात घेऊन नियोजन: भविष्यातले रस्ते जोडण्याचे टप्पे आणि सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले रस्त्यांचे जाळे हे सगळं विचारात घेऊन महागाईचा अंदाज लक्षात घेत बजेट ठरवलं आहे. त्यामुळे जास्तीचा खर्च टाळता आला.

जमीन अधिग्रहणाचा खर्च कमी : रचना आणि लेनची रुंदी कमी केल्यामुळे ‘राईट ऑफ वे' म्हणजेच आवश्यक जागेची लांबी कमी झाली. त्यामुळे जमीन विकत घेण्याचा आणि प्रकल्पबाधितांवर होणारा खर्च बराच कमी झाला.

Advertisement

कनेक्टरच्या रचनेत सुधारणा: पूर्वी दोन खांबांवर (पियर्स) असलेली रचना होती, त्याऐवजी एका खांबावर आधारित असेल. त्यामुळे बांधकाम स्वस्त आणि पर्यावरणपूरक बनलं.

तात्पुरते खर्च, सल्लागार फी आणि सुरुवातीचे इतर खर्च कमी: त्यामुळे एकूण खर्चात मोठी बचत झाली.

( नक्की वाचा : Pune Metro : पुणेकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी )

कसा आहे प्रकल्प?

एकूण लांबी: 55.12 किमी
मुख्य सागरी मार्ग: 24.35 किमी
कनेक्टर्स: 30.77 किमी
उत्तन कनेक्टर (9.32 किमी) – बृहन्मुंबई महापालिकेच्या दहिसर-भाईंदर लिंक रोडशी जोड
वसई कनेक्टर (2.5 किमी) - पूर्णपणे उन्नत
विरार कनेक्टर (18.95 किमी) - वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेला जोडणारा

सद्यस्थितीत मुख्य सागरी मार्गासाठी 3+3 लेन कॉन्फिगरेशन (25.1 मीटर रुंद) आणि कनेक्टर्ससाठी 2+2 लेन कॉन्फिगरेशन (18.55 मीटर रुंद) प्रस्तावित आहे. या रचनेमुळे पुढील तीन दशकांमध्ये प्रवाशांची सोय आणि कार्यक्षमतेची खात्री होते.

निधी संकल्पना

37,998 कोटी (72.17%) – जायका (JICA)/बहुपक्षीय निधीकडून प्रस्तावित (टोल वसुलीच्या आधारे परतफेड)
14,654 कोटी (27.83%) – महाराष्ट्र सरकार/एमएमआरडीएकडून भांडवली (इक्विटी) स्वरुपात 

Topics mentioned in this article