- मुंबई महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली तयार केली आहे
- सार्वजनिक स्थळी थुंकल्यास, कचरा टाकल्यास तसेच वर्गीकरण न केल्यास निश्चित रकमेचा दंड आकारला जाणार आहे
- स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी उपायुक्त किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली नियमित कार्यवाही केली जात आहे
मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा आणि स्वच्छता विषयक जागृता निर्माण केली जात आहे. यामध्ये कचरा निर्माण करणारे घटक, विविध आस्थापना, कचराविषयक सेवा प्रदाता, घनकचरा व्यवस्थापन, साठवणूक, वितरण व प्रक्रिया, या बाबत नियमावलींचा समावेश आहे. नागरिक किंवा आस्थापनांनी यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या अंतर्गत, सार्वजनिक स्थळी थुंकल्यास 250, कचरा टाकल्यास 500, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास 200 रूपये, विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास थेट 25 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली कार्यक्षेत्रातील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे कार्यवाही केली जाते. यासह वेळोवेळी विशेष स्वच्छता मोहीम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर, हा उपविधी (Bylaws) जारी करण्यात येत आहे. मुंबईत घनकचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अविरतपणे प्रयत्न केले जात आहेत असं अश्विनी जोशी यांनी सांगितले.
कचरा निर्माण करणारे सर्व व्यक्ती, सार्वजनिक व खासगी ठिकाण, निवासी, व्यापारी, वाणिज्यिक, व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय, निमशासकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, धार्मिक, मनोरंजनात्मक, सामाजिक तसेच इतर सर्व प्रकारच्या वापराच्या स्थळांसाठी लागू असतील. यामध्ये प्रामुख्याने कचरा टाकण्यास व इतर उपद्रवांवर बंदी आणि ‘स्वच्छ आंगण / परिसर / जागा' सुनिश्चित करणे, घनकचऱ्याचे विलगीकरण करणे याचा समावेश करण्यात आला आहे.
नागरी घनकचऱ्याची साठवणूक आणि वितरण, उत्पादक, महानगरपालिका प्रशासन, प्रतिनिधी आणि कंत्राटदार यांची जबाबदारी व कर्तव्ये, वस्तू पुनर्प्राप्ती सुविधा (एमआरएफ), घनकचरा, जैव-वैद्यकीय कचरा, ई-कचरा, बांधकाम व पाडकाम राडारोडा,प्लास्टिक कचरा आदींसंदर्भात सविस्तर नियमावलीचा समावेश आहे. विविध आस्थापना, नागरिक तसेच संबंधित सर्वांनी मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. आपले घर, परिसर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. उपविधीतील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील डॉ. अश्विनी जोशी यांनी केले.
रस्ते / गल्ल्या / पदपथ / बाग / सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 500 रूपयांचा दंड आकारला जाईल. शिवाय थुंकल्यास 250 रूपये दंड भरावा लागेल. खुल्या आणि सार्वजनिक जागांवर आंघोळ करणे ही महाग पडणार आहे. अशा लोकांना 300 रूपये दंड भरावा लागेल. तर लघवी करणे 500,शौच करणे 500, मोकळ्या जागी व सार्वजनिक ठिकाणी प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य देणे 500, सार्वजनिक ठिकाणी भांडी,कपडे, इतर कोणत्याही वस्तू धुणे 300 , वाहन धुणे 500 रूपये दंड आकारला जाणार आहे. अंगण स्वच्छ न ठेवणे ही यापुढे गरजेचे आहे. तसे न केल्या 500 ते 1500 रूपये दंड होवू शकतो.