- राजस्थानमधील जोधपूर येथे हिरव्या मिरच्यांच्या आत अमली पदार्थ तस्करीचा प्रकार उघड झाला
- खाजगी बसमधून मिरच्यांच्या पार्सलमध्ये चमकील्या कागदात गुंडाळलेले एमडी ड्रग्ज आणि स्नॅक्स वापरले जात होते
- या तस्करीत वापरलेल्या एका हिरव्या मिरचीची बाजारातील किंमत पाच हजार रुपये होती
मिरची ही जेवणात महत्वाचा घटक समजली जाते. अनेकांना मिरची शिवाय जेवण ही संकल्पनाच मान्य नसते. मिरची भजी पासून ते चिकन चिल पर्यंत सर्वात मिरची महत्वाची ठरते. पण हीच हिरवी मिरची 5 हजार रूपयांना भेटत असेल तर? तुम्हाला आश्चर्य वाटले ना. पण हो एकाच मिरचीची किंमत पाच हजार आहे. ही बाब समोर आल्यानंतर सर्वच जण चक्रावले आहेत. त्याला कारण ही तसेच आहे. कारण हिरव्या मिरचीचा तिखट कारनामा समोर आला आहे. ही घटना राजस्थानमध्ये उघड झाली आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीसाठी तस्कर नवनवीन आणि अजब मार्ग शोधत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जोधपूरमध्ये खाजगी बसमधून पार्सलच्या नावाखाली एमडी ड्रग्ज (MD Drugs) आणि स्नॅकची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, यासाठी मथानिया आणि सोयला येथील प्रसिद्ध हिरव्या मिरच्यांचा वापर करण्यात आला होता. या एका मिरचीची किंमत तस्करीच्या बाजारात सुमारे 5,000 रुपये असल्याचे समोर आले आहे. ही बाब उघड झाल्यानंतर कारवाई करणारे अधिकारी ही चक्रावून गेले आहेत.
जोधपूरहून हैदराबादला जाणाऱ्या एका खाजगी बसमध्ये हे पार्सल ठेवण्यात आले होते. बस ड्रायव्हरला पार्सलबद्दल संशय आल्याने त्याने ते उघडून पाहिले. वरून साध्या दिसणाऱ्या मिरच्यांना मधून छेद देऊन त्यात चमकील्या कागदात गुंडाळलेले अमली पदार्थ भरले होते. ड्रायव्हरने तातडीने याचा व्हिडिओ बनवून अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोला (NCB) माहिती दिली. ब्युरोने ही गांभिर्य लक्षात घेवून जलदगतीने कारवाई केली. संपूर्ण मिरची तपासण्या आली. त्यात ड्रग्ज लपवल्याचे समोर आले.
एनसीबीचे विभागीय संचालक घनश्याम सोनी यांनी सांगितले की, मिरचीचा वापर करून तस्करी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी 'ऑपरेशन त्रिनेत्र' राबवले जाणार आहे. तसेच नागरिकांनी मानस 1933 या हेल्पलाइनवर गुप्त माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे तस्करी उघड झाली. जोधपूर ते हैदराबाद या प्रवासादरम्यान बस ड्रायव्हरला काही मिरच्यांना मधून कापलेले दिसले. त्याने पार्सल तपासले असता आत ड्रग्ज असल्याचे स्पष्ट झाले.
तस्करांच्या या नव्या पॅटर्नमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अमली पदार्थांच्या विरोधातील या लढ्यात सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे आणि संशयास्पद हालचालींची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन एनसीबीने केले आहे. ही घटना संपूर्ण यंत्रणेसाठी धक्का देणारीच म्हणावी लागेल. ड्रग्जची तस्करी करण्यासाठी तस्कर आता नवनव्या आयडीया शोधत आहेत. त्यामुळे यंत्रणांना ही या पुढच्या काळात सतर्क राहावे लागणार आहे. शिवाय राजस्थानमध्ये याबाबत खास नजर ठेवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world