सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक सध्या त्याने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. मुंबईतील घाटकोपर येथील एका सोसायटीत प्रसाद राहतो. त्याच्या सोसायटीत पांढऱ्या रंगाची पट्टी मारल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याने व्हिडिओ शेअर करीत यावर आक्षेप नोंदवला आहे.
पांढरी पट्टी कशासाठी, नेमका काय आहे वाद?
प्रसाद वेदपाठक याच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी ही पांढऱ्या रंगाची पट्टी मारल्याची माहिती समोर आली आहे. सोसायटीतील इतर कमिटीमधील सदस्यांना विश्वासात न घेता ही पट्टी मारल्याचं सांगत प्रसाद वेदपाठकने आवाज उठवला आहे. प्रसाद वेदपाठकने दिलेल्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी आखण्यात आली आहे. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी कराव्यात सार्वजनिक ठिकाणी असं प्रकारच्या कृत्यावर प्रसादने आक्षेप नोंदवला आहे.
सोशल मीडिया इनफ्लूएन्सर प्रसाद वेदपाठक याचं जैन धर्माला आव्हान
घाटकोपरमधील सोसायटीमध्ये आखलेली पांढऱ्या रंगाची पट्टी पुसली नाही, तर धरणे आंदोलनावर बसणार असल्याचं प्रसादने NDTV शी बोलताना म्हटलं आहे. केवळ आंदोलन नाही तर पांढऱ्या पट्टीवर मांस-मच्छी शिजवून खाण्याचा इशारा त्याने दिला आहे.
पांढरी पट्टी का मारली जाते?
जैन धर्मगुरू चप्पल घालत नाहीत. सध्या ऊन जास्त आहे. त्यामुळे चालताना कमी चटके बसावेत यासाठी ही पांढऱ्या रंगाची पट्टी मारली जाते. ज्यामुळे उन्हाचा त्रास कमी होईल. याशिवाय जैन समाजात कोणत्याही प्रकारची हत्या केली जात नाही. चालताना रस्त्यावरील शेवाळांवरील जंतू मारले जाऊ शकतात यासाठीही ही पट्टी मारली जात असल्याचं सोशल मीडियावरील काही व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world