
Vande Bharat Train : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला आता २० डब्यांची परवानगी मिळाली आहे. रेल्वे बोर्डाच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या ही गाडी १६ डब्यांची होती, मात्र आता वाढीव क्षमतेसह धावल्याने प्रवाशांना अधिकाधिक सोयी सुविधा मिळणार आहेत.
प्रवाशांच्या मागणीलाय यश
वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी गेल्या ४-५ महिन्यांपासून मागणी केली जात होती. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे आणि या एक्स्प्रेसच्या लोकप्रियतेमुळे रेल्वे बोर्डाकडे यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. आता २० डब्यांसह असलेली वंदे भारत एक्स्प्रेस नवीन वेळापत्रकानुसार धावेल, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
(नक्की वाचा- New Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुडन्यूज! पुण्यातून लवकरच 4 नव्या 'वंदे भारत एक्सप्रेस' धावणार)
मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस ही सध्या मुंबई ते सोलापूर हे ४९२ किलोमीटरचे अंतर ६ तास ३० मिनिटांत पूर्ण करते. दररोज सायंकाळी ४ वाजता ही एक्स्प्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटते आणि रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सोलापूर स्थानकावर पोहोचते. दुसऱ्या दिशेने, सकाळी ६ वाजता सोलापूर स्थानकावरून सुटून दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी मुंबईत परत येते.
(नक्की वाचा- Cidco Lottery : सिडकोची लॉटरी काढण्यास उशीर का होत आहे? अंदाजे तारीख आली समोर)
फक्त मुंबई-सोलापूर मार्गासाठीच नव्हे, तर ज्या इतर वंदे भारत एक्स्प्रेस मार्गांवर १०० टक्के आरक्षण मिळत नाही, त्या सर्व मार्गांवर प्रवाशांच्या वाढीसाठी डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय लागू असेल. यामुळे प्रवाशांची संख्या सुमारे २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे मुंबई, पुणे, सोलापूर आणि परिसरातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world