
केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतील टँकर चालकांनी संप पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानंतर मुंबई महानगरपालिकेने विहीर आणि कूपनलिका धारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती दिली आहे. असे असूनही टँकर चालक संप मागे घेत नसल्याने, व्यापक जनहित लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्यानुसार मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी गृहनिर्माण संस्था यांच्यासह संबंधित घटकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धती देखील निश्चित केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्रीय भू-जल प्राधिकरण यांनी नवीन नियमावली लागू केली आहे. या नियमावलीनुसार सर्व विहीर तसेच कूपनलिका धारकांनी केंद्रीय भू-जल प्राधिकरण यांचे 'ना-हरकत प्रमाणपत्र' प्राप्त करावे,या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील विहीर व कूपनलिका मालकांना नोटीस बजावण्यात आले होते. तथापि, या नोटिशींनंतर पाणी उपलब्धतेमध्ये अडचणी येऊ लागल्याने टँकर चालक संघाने संप पुकारला आहे. केंद्रीय भू-जल प्राधिकरणाचे बदललेले नियम आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टँकरचालकांच्या मागण्या व त्यांचा संप यावर तातडीने तोडगा काढावा. कारण मुंबईतील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, याची काळजी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेला केली होती.
तसेच, केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय भू-जल प्राधिकरणाला निर्देश दिले की,'ना-हरकत प्रमाणपत्र' प्राप्त करण्यासाठी उपलब्ध असलेली एक खिडकी प्रणाली 'भू–नीर' ही अधिक सुलभ करावी. तसेच या प्रणालीविषयी जास्तीत जास्त जनजागृती करावी. त्याचप्रमाणे 'ना-हरकत प्रमाणपत्र' प्राप्त करण्यासाठी नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता केंद्रीय भू-जल प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सहाय्य पुरवावे. या दोन्ही प्राप्त निर्देशांच्या अनुषंगाने, मुंबईतील विहीर व कूपनलिका धारकांना महानगरपालिकेने बजावलेल्या नोटिशींना 15 जून पर्यंत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थगिती दिली.
प्रशासनाकडून सहकार्याची पावले उचलण्यात आल्यानंतरही टँकर चालकांनी अद्याप संप मागे घेतलेला नाही. त्यांच्या मागण्यांवर ते अडून आहेत. सबब, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्यासारख्या जीवनावश्यक गरजेचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, व्यापक जनहिताकरिता या समस्येचे निराकरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्यानुसार मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील खासगी गृहनिर्माण संस्थांसह संबंधित घटकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धती देखील निश्चित केली आहे.
मुंबई शहरात 2 हजार 500 ते 3 हजार इतकेच टँकर सध्या अधिकृत असल्याचे सांगितले जात आहेत. प्रत्यक्षात या टँकरची संख्या 40 ते 50 हजार असल्याचे सांगितलं जात आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणात केवळ 31 टक्के पाणीसाठा राहिलेला आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणी येत असल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर अनेकांनी पाणी बिल महापालिकेला भरलेले नाही त्यामुळे अशा वस्त्यांमध्ये देखील पाणी कपात सुरू असल्याचे अधिकारी सांगतात. मात्र या सगळ्याला उपाय म्हणून नागरिक वॉटर टँकरचा पर्याय उपलब्ध असल्याचे सांगतात. मात्र हाच पर्याय बंद असल्याने नागरिकांचेही प्रचंड हाल झाले आहेत. मात्र त्यातन आता त्यांची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world