- नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याच्या आराई गावात भूत आल्याच्या अफवा सोशल मीडियावर जोरदारपणे पसरल्या आहेत
- गावातील मोकळ्या जागा आणि निरुपयोगी ठिकाणी भुताचा संचार असल्याचा मेसेज
- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भूतांच्या फोटोंमुळे भीतीचे वातावरण
निलेश वाघ
भूता-खेताच्या असू दे किंवा जादू टोण्याच्या असूदे. या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. कुठे ना कुठे अशा घटना ऐकायला भेटतात. काही लोक तर जुन्या आठवणी सांगतात. मात्र नाशिक जिल्ह्यातील एका गावात चक्क भूत आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ऐवढेच काय तर गावात आलेल्या भूताचे फोटो ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण गावातच काय तर अजूबाजूच्या परिसरात ही भीतीचे वातावरण आहे. खरोखर गावात भूत आले आहे का यासाठी पोलीस ही सरसावले आहेत.
नाशिकच्या सटाणा तालूक्यातील आराई गावात गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर गावात भूत आल्याचे वृत व्हायरल झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थामध्ये भितीचं वातावरण पसरले आहे. गावाच्या परिसरात अनेक मोकळ्या जागा आहेत. या जागांवर, तसेच जिथे लोक राहत नाही अशा ठिकाणी या भुताचा संचार असल्याचा संदेश पसरविण्यात आला आहे. हा संदेश वाऱ्या सारखा पसरला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सगळीकडे भीतीचे वातावरण ही आहे.
सोशल मिडीयावर पसरविण्यात आलेले फोटो जुने व एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कोणी तरी तयार करून पसरविले आहेत असं सांगितलं जात आहे. मात्र यामुळे आराई गावात मात्र मोठा गोंधळ उडाला आहे. पोलिस प्रशासनासह गावातील तरुणांनी रात्रीच्या गस्त घालण्यास सुरूवात केली आहे. मात्र त्यांना कुठेही भूत असल्याच आढळून आले नाही. तर गावात ग्रामसभा घेत अशा अफवा पसरविण्यावर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सरपंच दिलीप सोनवणे यांनी अफवा पसरवणाऱ्यां विरोधा कडक भूमीका घेतली आहे. तर सटाण्याचे पोलीस निरिक्षक योगेश पाटील यांनी अफवांवर विश्वास ठेवून नका असे आवाहन गावकऱ्यांना केले आहे. कोणी तरी खोडसाळपणा करीत भूत असल्याचे वृत्त पसरविले आहे. त्यावर विश्वास ठेवू नये. जर अशा स्वरूपाच्या अफवा कुणी पसरवत असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला धडा शिकवला जाईल असं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पण गेल्या काही दिवसापासून हे गाव प्रचंड दहशतीत आहे.