- नाशिकमध्ये चारशे कोटी रुपयांच्या कंटेनरच्या कथित लूट आणि अपहरण प्रकरणाचा तपास CID कडे सुपूर्त
- या प्रकरणात सुरुवातीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी SIT ची स्थापना करून तपास केला होता
- तक्रारदार संदीप पाटील यांनी पोलिस तपासावर गंभीर आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली
प्रांजल कुलकर्णी
Nashik 400 Crore Robbery: चारशे कोटी रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेल्या कंटेनरच्या कथित लूट आणि अपहरण प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणाचा तपास SIT कडून काढून थेट CID कडे सुपूर्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी नाशिक पोलिसांनी हे प्रकरण खोटं असल्याचा दावा करत क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र आता गृहविभागानेच नाशिक ग्रामीण पोलीसांच्या तपासावर संशय व्यक्त केलाय का ? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. त्यामुळे या प्रकरणालाच आता वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी आणि ऐन महापालिका निवडणुकांच्या काळात नाशिकमध्ये तब्बल 400 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांच्या लुटीचे प्रकरण चर्चेला आले होते. विशेष म्हणजे हे पैसे लुटल्याच्या कारणावरून अपहरण देखील करण्यात आल्याच आरोप नाशिक मधील संदीप पाटील यांनी केला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्यांच्या तक्रारीनुसार घोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण संवेदनशील दिसून येताच नाशिक ग्रामीण पोलीसांनी थेट SIT ची देखील स्थापना केली. तपास सुरू केला. संदीप पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गोव्यातून कर्नाटककडे जाणारा ट्रक होता. त्यात जुन्या नोटा भरल्या होता. हा कंटेनर घाट परिसरात अडवून लुटण्यात आला. हे पैसे ठाण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक किशोर सावळा याचे होते. या कथित लुटीची रक्कम तब्बल 400 कोटी रुपये असल्याचा दावा तक्रारीतून करण्यात आला होता.
या प्रकरणी तक्रारदार संदीप पाटील म्हणाले की CID प्रकरण बाहेर काढतील. ऑडिओ क्लिप, cctv फुटेज सगळे काही मी दिले होते, ते तपासलेच नाही असा आरोप त्यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांवर केला आहे. हे प्रकरण दाबले गेले. ब्लॅक मनी असल्याने किशोर सावलाने तक्रार दिली नसेल. फरार असलेला आरोपी किशोर सावला स्वतःहुन पोलीसांकडे हजर होतो आणि त्यानंतर पूर्ण तपासाची दिशा फिरली असं ही ते म्हणाले. सावला समोर मला पोलीसांनी मारहाण केली होती असा आरोप ही त्यांनी केला. घाटात कंटेनर लुटल्याचे पुरावे SIT ला दिले होते असा दावा ही पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला नाशिक पोलीस आणि नंतर SIT कडे देण्यात आला होता. मात्र SIT ने आपल्या तपासात तक्रारदाराने खोटी तक्रार केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. शिवाय क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.
यासोबतच अपहरण प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका देखील करण्यात आली होती. तक्रारदार संदीप पाटील यांनी नाशिक पोलिसांच्या तपासावर गंभीर आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. तपासात अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, या प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे, SIT च्या क्लोजर रिपोर्टवरच गृहविभागाने संशय व्यक्त केल्याची चर्चा असून हा तपास आता थेट CID कडे सोपवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. चारशे कोटी रुपयांच्या कथित लुटीच्या या प्रकरणात आता CID तपास सुरू होणार असल्याने अनेक नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी क्लोजर रिपोर्ट देण्यात आलेल्या या प्रकरणात आता नेमकं सत्य काय आहे, हे CID तपासातून स्पष्ट होणार आहे. नाशिक पोलीस अधिकारी मात्र या प्रकरणावर कॅमेरासमोर बोलण्यास तयार नसून CID कडे तपास गेल्याने आम्ही बोलणे योग्य नसल्याचं त्यांनी कारण दिले आहे.एकीकडे तक्रारदाराचा लुटीचा दावा, दुसरीकडे पोलिसांचा खोटी तक्रारीचा निष्कर्ष आणि आता CID चा तपास. एकंदरितच या 400 कोटींच्या कथित लुटीचं गूढ उलगडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या संपूर्ण प्रकरणात नाशिक पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का ? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.