नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार आहे. त्याची माहिती स्वत:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नवी मुंबईतील विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईतल्या विमानतळावरचा ताण कमी होणार आहे. इथून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ हे नवी मुंबईचे विमानतळ असणार आहे. मुंबई आणि देशाच्या दृष्टीने हे विमानतळ अतिशय महत्वाचे समजले जाते. मुंबई शहर, जेएनपीटी यांच्या जवळ असलेले हे विमानतळ आहे. या विमानतळाच्या नामकरणावरून आंदोलने झाली आहे.
दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले जावे अशी मागणी स्थानिकांनी घेतली आहे. दि. बा. पाटील यांचे या भागातील योगदान मोठे आहे. त्यांचा प्रकल्पाग्रस्तांसाठीचा लढा कोणीही विसरू शकत नाही. आज इथले भूमीपूत्र दि. बा. यांच्यामुळे स्थिरस्थावर झाले आहेत. त्यांचे योगदान हे प्रत्येक क्षेत्रात राहीले आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत होत असलेले विमानतळ हे दि.बा. पाटील यांच्याच नावाने झाले पाहीजे अशी जोरदार मागणी केली जात आहे. शिवाय या विमानतळाच्या बाहेर ही दि. बा. पाटील नगरी असे बॅनर आतापासूनच झळकू लागले आहेत.
आग्री कोळी समाजाने ही मागणी आधी पासूनच लावून धरली आहे. सरकारला निवेदनेही दिले आहेत. मोर्चे ही काढण्यात आले आहे. तसे झाले नाही तर विमानतळ चालू देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. आता हे विमानतळ काही दिवसात कार्यान्वित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठीवला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्य सरकार त्याबाबत पाठपुरावा करत आहे. केंद्र सरकार आणि हवाई वाहतूक मंत्रालय ही या नावासाठी अनुकूल आहे. त्यांनीही त्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे नाव देण्याची प्रक्रीया ही शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे स्पष्ट संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे दि. बा यांचे विमानतळाला नाव देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनीही जनभावना लक्षात घेता दि.बा. यांचे नाव विमानतळाला दिले नाही तर राजीनामा देण्याची धमकी दिली होती.