राहुल वाघ, प्रतिनिधी
Nashik News : नाशिकच्या आनंदवल्ली परिसरातील एका लॉन्सवर 'हिंदूंचा रुपया हिंदूंनाच' या हिंदू लघु व्यावसायिकांच्या यादीच्या प्रकाशनावेळी मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये आज १५ मार्च रोजी रॅली काढण्यात आली.
नाशिकभर झळकले पोस्टर...
समाजात शांतता, एकोपा आणि परस्पर सलोखा टिकून राहावा तसेच सर्व धर्मांमध्ये बंधुभाव वाढावा या उद्देशाने सकल मुस्लीम युवक महाराष्ट्र यांच्या वतीने नाशिक शहरात एकता जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शहरातील शालिमार चौक, मेनरोड, भद्रकाली मार्केट तसेच दूध बाजार परिसरात फलक घेऊन नागरिकांना एकतेचा आणि भाईचाऱ्याचा संदेश देण्यात आला.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?
"हिंदूंकडून हिंदूंनी खरेदी करावी या संकल्पनेवर हा कार्यक्रम आयोजित केला. ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे अभिनंदन. मी खारघरच्या कार्यक्रमात अशी भूमिका मांडली होती. आजूबाजूला जिहादी लोकांची दुकाने होती. मध्येच माझा कार्यक्रम होता. हिंदूंनी हिंदूंकडून घ्यावे म्हटलो. मीडियाच्या बंधूंनी मला झोडझोड झोडले. मला त्याचे काहीही तेव्हा वाटलं आजही काही वाटलं नाही. मी हिंदूचे नाहीतर मग पाकिस्तानबद्दल बोलायचं का? ९० टक्के लोकं इथं राहतात, हे हिंदूच राष्ट्र आहे, इथं सर्वधर्म समभाव भाईचारा चालणार नाही," असं मंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.
"हिंदू बघूनच व्यवहार करण्याचा पुढाकार घ्या. कुंभ मेळ्याच्या बाबत तेव्हाही भूमिका स्पष्ट केली आहे. कुंभमेळ्यात हिंदूंची दुकाने लावावी, हिरवा साप वळवळता कामा नये, आता त्यांचा रमजान सुरू आहे. असे पदार्थ ठेवतात त्याकडे बघू वाटत नाही, रमजान काळात एका हिंदूंचे दुकान लागत नाही. हिंदूंचे पदार्थ ते विकत नाहीत,असा एकही माणूस तिथं भेटणार नाही. कुंभ मेळ्यात एक पण जिहादी आला नाही पाहिजे, त्याची हिम्मत नाही झाली पाहिजे," असा इशाराही नितेश राणेंनी यावेळी दिला.