मनोज सातवी, पालघर
हेडफोन घालून रुळ ओलांडणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा राजधानी एक्सप्रेसची धडक बसल्याने मृत्यू झाला आहे. पालघरच्या सफाळे येथे ही घटना घडली आहे. वैष्णवी रावल असं अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. वैष्णवी माकणे येथे राहत होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी गुरूवारी कानात ईयरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत होती. याच दरम्यान गुजरातकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस भरधाव वेगाने जात होती. मात्र कानात ईयरफोन घातल्यामुळे तिला ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही आणि तिला रेल्वेची जोरदार धडक बसली. एक्सप्रेसच्या धडकेत वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला.
(ट्रेंडिंग बातमी - Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांचे आगामी निवडणूकांत स्वबळाचे संकेत पण...)
वैष्णवी इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. सफाळे स्थानकात कानात ईयरफोन घातल्याने अपघात होण्याची ही दोन महिन्यांतील दुसरी घटना आहे. या अगोदर 7 डिसेंबर रोजी नितेश चौरसिया या तरुणाचा याच ठिकाणी कानात ईयरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना अशाच प्रकारे अपघात होऊन मृत्यू झाला होता.
दरम्यान, या रेल्वे फाटकाजवळ पादचारी पुल नसल्याने विद्यार्थीनीचा जीव गेला. यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील येण्या-जाण्यासाठी रेल्वे फाटकात पादचारी पुल बांधावा अशी मागणी करत माकणे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. सदर घटनेची माहिती नागरिकांना मिळतात रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात माकणे ग्रामस्थांनी गर्दी केली होती.