Palghar News: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील (MIDC) चित्रालय परिसरात आज प्रशासकीय कारवाई दरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. ओटला मार्केटमधील दुकाने हटवण्याच्या मोहिमेला स्थानिकांनी हिंसक विरोध केला. या चकमकीत दोन जण जखमी झाले असून, संतप्त जमावाने अधिकाऱ्यांना पळवून लावल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
विना नोटीस कारवाईचा आरोप
चित्रालय परिसरातील ओटला मार्केटमध्ये एमआयडीसीचे पथक अचानक बुलडोझर घेऊन दाखल झाले. प्रशासनाने कोणतीही आगाऊ नोटीस न देता थेट दुकाने पाडण्यास सुरुवात केली. वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: "...तर 'लाडकी बहीण' योजना बंद करा," हायकोर्टाने राज्य सरकारला झापले)
सुरक्षा रक्षकांसमोरच अधिकाऱ्यांना लक्ष्य
एमआयडीसीच्या सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात ही कारवाई सुरू होती, तरीही परिस्थिती हाताबाहेर गेली. संतप्त दुकानदारांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांचा तब्बल दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांना पळ काढावा लागला.
काही समाजकंटकांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या गाड्यांवर दगडफेक केली. यामध्ये पथकाचे मोठे नुकसान झाले आहे. या गोंधळात आणि चकमकीत दोन स्थानिक नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
नक्की वाचा- Pune Railway News: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे स्टेशन)
प्रशासनाकडून कोणतीही तक्रार दाखल नाही
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, सरकारी कामात अडथळा आणून अधिकाऱ्यांवर हल्ला झाला असतानाही एमआयडीसी प्रशासनाने अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे 'नक्की गौडबंगाल काय?' असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारवाईत पारदर्शकता नव्हती की अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे, अशी चर्चा आता बोईसरमध्ये रंगली आहे.