Chhatrapati Sambhajinagar : घरच्यांनी मोबाईल घेऊन दिला नाही, म्हणून एका १६ वर्षीय मुलाने डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात उघडकीस आली आहे. अथर्व गोपाल तायडे असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.
अधिक माहितीनुसार, अथर्व सध्या वाळूज येथे राहत होता व पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण घेत होता. काही दिवसांपासून अथर्वने आईकडे मोबाईल घेण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, आईने नकार दिल्याने नाराज झालेल्या अथर्वने रविवारी तिसगाव येथील खवड्या डोंगरावरून खाली उडी मारली. जखमी अथर्वला नागरिकांनी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
(नक्की वाचा - Jalne News: भाजप आमदाराचा कार्यकर्ता निघाला चोर, त्याने कसली चोरी केली माहित आहे का?)
एका मोबाईलच्या हट्टापायी एका १६ वर्षीय मुलाने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना वाळूज परिसरात घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, आईचा आक्रोश ऐकून उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले. या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सलीम शेख यांच्यासह पथकाने घटनास्थळी पाहणी केली आणि पुढील कायदेशीर कारवाई केली.
(नक्की वाचा - Ramdas Kadam: 'गृहराज्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी पोलिसांनीच षडयंत्र रचले', कदमांचा मोठा आरोप)
अल्पवयीन मुलांमध्ये मोबाईलचा क्रेझ वाढला...
गेले काही वर्षात मोबाईलचा क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच अल्पवयीन मुलांमध्ये मोबाईलचा वाढता क्रेज चिंताजनक ठरत आहे. शिक्षणाच्या वयात मुलं मोबाईलमध्ये अडकून पडली आहे. अनेक मुलं महागडे स्मार्टफोन साठी हट्टहास करताना देखील पाहायला मिळतात. आता तर मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या करण्यापर्यंत मुलं टोकाचे पाऊल उचलत असल्याचं समोर आल्याने पालकांची चिंता वाढली आहे.