Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर अखेर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असला तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आता नवा पेच निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
राष्ट्रवादीचा अध्यक्ष मराठीच असावा
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर काही मिनिटांतच राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात जो विचका झाला आहे, त्यावर भाष्य करण्याची इच्छा नसली तरी सध्याच्या घडामोडींवर बोलणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महाराष्ट्राच्या मातीतील आणि रांगडा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीतरी मराठीच असायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, अध्यक्षपदी पाटील चालतील पण पटेल नकोत, अशा शब्दांत त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर निशाणा साधला आहे.
अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचे नाव चर्चेत
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबत पक्षात दोन गट पडल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे आता उपमुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी आल्याने त्या पक्षसंघटनेसाठी किती वेळ देऊ शकतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, प्रफुल्ल पटेल हे सध्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्याकडून अध्यक्षपदासाठी दावा केला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पटेल यांच्या नावाला विरोध दर्शवत मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.