प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेपूर्वी मोठा प्लान; तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न, दोन मोठ्या नेत्यांना खुली ऑफर 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर हे दोन नेते एकत्र येतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ यांना खुली ऑफर दिली आहे. “भुजबळ यांनी आमच्याबरोबर यावं”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. “छगन भुजबळ हे शंभर टक्के ओबीसीवादी नेते आहेत आणि त्यांनी आमच्याबरोबर यावं असं आम्हाला वाटतं”, असंही आंबेडकर म्हणाले. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. तर प्रकाश आंबेडकर देखील ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. अशातच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर हे दोन नेते एकत्र येतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांना प्रसारमाध्यमांकडून ओबीसींबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. छगन भुजबळ यांना तुमच्यासोबत घेणार का, असाही सवाल त्यांना विचारण्यात आला होता. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी तर वाट पाहतोय, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (अजित पवार गट) बाहेर पडावं आणि आमच्याबरोबर यावं. भुजबळ हे शंभर टक्के ओबीसीवादी नेते आहेत. पण त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का याचा खुलासा केवळ भुजबळच करू शकतात. यावर दुसरं कोणीही बोलू शकत नाही. आम्हाला असं वाटतं की त्यांनी आमच्याबरोबर यावं”.

नक्की वाचा - महायुतीतील मित्रपक्षांमध्ये आलबेल नाही, पुण्यातील पोस्टरवरुन नवा वाद रंगणार!

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीलाही वंचितबरोबर येण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष चालू आहे. अशातच प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं चित्र आहे. यात त्यांनी माकपला त्यांच्याबरोबर येण्याचं आवाहन केलं आहे. आंबेडकर यांनी मागील निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाबरोबर युती करून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निवडणुकीत त्यांना फारसं यश मिळालं नाही. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आंबेडकर पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रकाश आंबेडकरांची माकपलाही ऑफर
प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही माकपला तुमच्याबरोबर घेणार का? त्यावर ते म्हणाले, माकपचा त्यांच्या जोडीदाराबरोबर काडीमोड व्हायला हवा. तरच त्यांची नवी सोयरीक होईल. त्यांचा काडीमोड व्हायला हवा असं मला वाटतं. त्यांनी महाराष्ट्रात आमच्याबरोबर यावं. मी केरळ किंवा पश्चिम बंगालमधल्या माकपबद्दल बोलत नाहीये. मी महाराष्ट्रातील माकपबद्दल बोलतोय. सध्या मी त्यांचा काडीमोड होण्याची वाट पाहणार आहे. अन्यथा आम्ही त्यांच्याशी लग्न कसं करणार?

Advertisement