Pune Budhwar Peth Story : आज समाजातील असे अनेक घटक आहेत, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं त्यांच्या सध्याच्या परिस्थितीकडे पाहिलं की लक्षात येतं. असाच एक घटक म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीया. अनेकजण यांची गरज अधोरेखित करताना दिसतात तर काही जण याकडे तुच्छतेच्या नजरेतून पाहतात. देशभरातच काय जगभरात अशा अनेक 'बदनाम गलिया' आहेत. ज्याबाबत खुलेपणानं बोललं जात नाही. राज्याचं सांस्कृतिक शहर असलेलं पुण्यातील बुधवार पेठही त्याचाच एक भाग. आजही बुधवार पेठ म्हटलं की लोकांच्या भुवया उंचावतात. त्याकडे वाईट नजरेचं पाहिलं जातं आणि या बुधवार पेठेतील गल्ल्यांमध्ये असे अनेक कहाण्या आहेत ज्यापासून आपण अनभिज्ञ आहोत.
वेश्यावस्ती म्हटलं की तेथील स्त्रीयांच्या अगतिकतेविषयी बोललं जातं. मात्र तिथे येणारा पुरुष हा वाईट असल्याचंही म्हटलं जातं. मात्र तेथे येणारा प्रत्येक पुरुष हा वाईट नसतो असं मत वेश्यावस्तीतील महिलांसाठी काम करणाऱ्या तेजस्वी सेवेकरी यांनी मांडलं आहे. आरपार या युट्यूब चॅनलवरील मुलाखतीदरम्यान त्यांनी बुधवार पेठेतील दुसरी बाजू उलगडून सांगितली. त्या सहेसी संघ या संस्थेच्या माध्यमातून वेश्यावस्तीत जगणाऱ्या महिलांसाठी काम करत आहेत.
बुधवार पेठ केव्हापासून सुरू झाली? सुरुवातीला याचं स्वरुप कसं होतं?
सामाजिक कार्यकर्त्या तेजस्वी सेवेकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेची सुरुवात पेशवे काळात सुरू झाल्याचं सांगितलं. सुरुवातीला त्याचा बावनखणी असा उल्लेख आढळतो. त्यावेळेसचं स्वरुप वेगळं होतं. त्यावेळेस पेशवा आणि सरदारांच्या मनोरंजानासाठी येथे महिला होत्या. त्या केवळ शरीरसुख देत नव्हत्या. नृत्य, गायनाच्या माध्यमातून पेशवे आणि सरदारांचं मनोरंजन केलं जात होतं. त्यावेळी महिलांची योग्य ती काळजी घेतली जात होती. त्यांना चांगलं मानधन दिलं जात होतं, अशी नोंद आहे. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात बदल झाला. ब्रिटीशांची छावणी येथे असल्याने त्यांचं मनोजंरन करण्यासाठी बुधवार पेठ मोठी वसवण्यात आली. त्यावेळी भारतातील वेगवेगळ्या भागातून देवदासी महिला बुधवार पेठेत येऊ लागल्या, त्यावेळी आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील अनेक देवदासी महिला बुधवार पेठेत येऊन वसू लागल्या.
बुधवार पेठेत येणारा प्रत्येक पुरुष वाईट असतो का?
बुधवार पेठेत येणारा पुरुष हा निम्न स्तरापासून ते मध्यमवर्गातील असल्याचं दिसतं. अगदी मजूर ते पांढरपेशी व्यक्तीही येथे पाहायला मिळते. प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं. प्रत्येक पुरुष येथे शरीरसुखासाठी येत नाही. या बुधवार पेठेत अनेक नाती फुलतात. यामध्ये मैत्री असते. अशा अनेक कहाण्या बुधवार पेठेत ऐकायला मिळतात, जिथं ३० ते ४० वर्षांपासून येणारा पुरुष आणि वेश्या महिलेची मैत्री आहे. महिला या पुरुषांच्या जीवनात डोकावत नाही, मात्र हक्कांनी ते एकमेकांच्या प्रश्नांना मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा याविषयी बोललं जात नाही, त्यामुळे सगळेच येथे येणारे पुरुष शरीरसुखासाठी येतात आणि सर्वजण वाईट असतात अशी समज चुकीची असल्याचंही तेजस्वी यावेळी म्हणाल्या.
अशा अनेक घटना आहेत, ज्यामध्ये महिला आणि पुरुषांचं जीवन बदललं आहे. अनेक पुरुषांनी वेश्या महिलेसोबत लग्नही केलं आहे. अनेक पुरुषांना कुटुंबाने दूर केलं, गावातील जमिनीवरील हक्क गमवावा लागला, मात्र अनेक पुरुषांनी या महिलेला आयुष्यभर साथ दिली.