यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यात एका 17 वर्षांच्या अल्पवयीन तरुणाची कोयत्याने सपासप वार करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून सात जणांच्या टोळीने या तरुणावर प्राणघातक हल्ला केला. सोमवारी रात्री गणेश हा आपल्या मित्रासोबत मोबाईल दुरुस्त करण्यासाठी गेला असताना आरोपींनी त्याला गाठले आणि धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील कात्रज परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हत्येच्या या गंभीर गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना भरपावसात गाडीला बांधून घटनास्थळी नेले आणि त्यांची धिंड काढली. भररस्त्यात काढण्यात आलेल्या या धिंडीमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : 'तू मरशील, माझे काय होणार?' कॅन्सर पीडित पतीला सोडून पत्नीने उरकले दुसरे लग्न; कोर्टाचे कडक पाऊल" )
पोलिस ठाण्याबाहेर नातेवाईकांचा गोंधळ
गणेश रविंद्र माळवे (वय 17) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याबाहेर प्रचंड गर्दी केली होती. आरोपींना आपल्यासमोर आणावे या मागणीसाठी नातेवाईकांनी संताप व्यक्त करत पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठा गोंधळ घातला.
हत्येत सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर लवकरात लवकर आणि अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी नातेवाईकांनी केली आहे.
( नक्की वाचा : Dombivli News :डोंबिवलीत 73 वर्षांच्या आजीबाईंना 'लिव्ह इन' ची हौस नडली, 57 लाख गेले, बँक खाते रिकामे )
सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एकूण 7 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना ताब्यात घेतले असून फरार असलेल्या उर्वरित 3 आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे कात्रज आणि आसपासच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भारती विद्यापीठ पोलिस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.