सूरज कसबे
शहरात पावसाने उघडीप देऊन काही दिवस उलटले आहेत. तरी मध्यवर्ती भागासह प्रमुख रस्त्यांवरील खड्डे अद्याप जैसे थे आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात एकूण 1444 खड्डे असून त्यापैकी 928 खड्डे बुजवण्यात आले आहेत. केवळ 516 खड्डे बाकी असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहता खड्ड्यांची संख्या पालिकेच्या आकड्यांपेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे.
पिंपरी चिंचवडच्या रहिवाशांना दररोज या जीवघेण्या खड्ड्यातूनच वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यानुळे लहान-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या खड्ड्यांमुळे मोठ्या अपघाताची भीती ही व्यक्त केली जात आहे. विशेषतः जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील नाशिक फाटा ते वल्लभनगर दरम्यानच्या रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे मेट्रोच्या कामामुळे पडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
परंतु, मेट्रो प्रशासन यासाठी थेट महापालिका प्रशासनाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी ढकलत आहे. तर दुसरीकडे पालिकाही याकडे दुर्लक्ष करत आहे. या दोन्ही प्रशासनांच्या टोलवाटोलवीत प्रत्यक्ष रस्त्यांवरील खड्डे मात्र जैसे थेच राहिल्याने प्रवाशांचे हाल अधिकच वाढले आहेत. तर दुसरीकडे, ज्या कंत्राटदारांनी हे रस्ते तयार केले आहेत, नियमानुसार रस्ता बनविल्यानंतर पुढील काही वर्षे त्या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची मुख्य जबाबदारी संबंधित कंत्राटदाराचीच असते.
मात्र, प्रत्यक्षात कंत्राटदार ही जबाबदारी पूर्णपणे झटकताना दिसत आहेत. मूळ कंत्राटदारांकडून काम करून घेण्याऐवजी महापालिका इतर ठेकेदारांच्या माध्यमातून डांबर, पेव्हिंग ब्लॉक, कोल्ड मिक्स, बीबएम आणि काँक्रिटचा वापर करून रस्त्यांची कशीबशी डागडुजी करत आहे. या अपुऱ्या व निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीमुळे काही दिवसांतच रस्ते पुन्हा पूर्ववत खड्ड्यात जात आहेत. त्यामुळे आता पालिका प्रशासन या निष्काळजी कंत्राटदारांवर काय कारवाई करणार आणि हे खड्डे लवकरात लवकर बुजवून वाहनधारकांना कधी दिलासा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.