- आम आदमी पक्षाने पुण्यात सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन आयोजित केले होते
- आंदोलनाचे प्रमुख मुद्दे नीट पेपर फुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होते
- एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्या दुचाकीची आंदोलनात तोडफोड करण्यात आली
यशपाल सोनकांबळे
आम आदमी पक्षाने पुण्यात आज आंदोलन आयोजित केलं होतं. सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन घेण्यात आले होते. शिवाय नीट पेपर फुटी प्रकरण,केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीमाना या मागण्या ही या आंदोलनाच्या केंद्र स्थानी होत्या. यासाठी स्वाक्षरी मोहिम राबवली जाणार होती. त्यासाठीच पोलीसांनी परवानगी दिली होती. पण या आंदोलनाला हिंसक वळण लागले. एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी आंदोलक घोषणाबाजी ही करत होते.
सोनम वांगचूक यांना समर्थन देण्यासाठी आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरली आहे. पुण्यात ही त्याचे पडसाद उमटले. पुण्याच्या राणी लक्ष्मी बाई पुतळा चौकात जंगली महाराज रोडवर हे आंदोलन घेण्यात आले. सरकारचा निषेध करण्यासाठी स्वाक्षरी मोहित राबवण्यात येणार होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या गाड्या आंदोलन स्थळी होत्या. एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनीधी यशपाल यांनी ही आपली दुचाकी याच ठिकाणी लावली होती. त्यावर प्रेस असे लिहीले होते.
हे पाहील्यानंतर आपचे कार्यकर्ते हिंसक झाले. त्यांनी घोषणाबाजी करत गाडीची तोडफोड करण्यास सुरूवात केली. गाडीचे नुकसान केले. त्याच वेळी पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांना केवळ स्वाक्षरी मोहिमेची परवानगी असताना त्यांनी रास्ता रोको करण्याचा ही प्रयत्न केला. त्यांमुळे जवळपास दिड तास वाहतूक विस्कळीत झाली होती. शेवटी पोलिसांनी या आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलन शांततेत करण्याची परवानगी असताना त्याला हिंसक वळण लागल्याचं दिसून आलं.
दरम्यान पत्रकारांच्या दुचाकीवर हल्ला झाल्याने याचा निषेध केला जात आहे. एकीकडे अन्याया विरोधात लढत असल्याचं सांगत दुसरीकडे अन्याय करत दुचाकीची तोडफोड करणं किती योग्य असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या हल्ल्याचा वेगवेगळ्या स्तरातून निषेध होत आहे. हे आंदोलन मुळ मुद्द्यापासून वेगळं होत चाललं आहे का असा प्रश्न ही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.