यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण प्रकरणांनंतर आता पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयटी सेक्टरमधील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या पुणे स्थित बीपीएम कॅम्पसवरुव सोशल मीडियावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, येथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची छळवणूक केली जात आहे. दरम्यान याबाबत इन्फोसिसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
छळवणुकीच्या आरोपांवर इन्फोसिसचं काय आहे म्हणणं?
इन्फोसिसने पुण्यातील आपल्या बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी छळवणुकीच्या सोशल मीडियावरील आरोपांवर अधिकृत निवेदन जारी केले आहे. कंपनीने कोणत्याही प्रकारच्या छळ किंवा भेदभावाबाबत झिरो टॉलरन्स धोरण असल्याचं स्पष्ट केलं आहे.
हे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) विरोधात नाशिकमध्ये सुरू आहे. वेगळ्या फौजदारी चौकशीमुळे राज्यातील आयटी उद्योग अधिक तपासणीखाली आला आहे. त्या प्रकरणात कामाच्या ठिकाणी छळवणूक आणि सक्तीच्या धर्मांतराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पुण्यातील महिला कर्मचाऱ्यांसोबत अयोग्य वर्तन झाल्याचे आरोप करणाऱ्या काही पोस्ट्स ‘X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यानंतर इन्फोसिसभोवती वाद निर्माण झाला. जरी संबंधित पोस्ट्स नंतर हटवण्यात आल्या असल्या, तरी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सरकारने या प्रकरणाची दखल घेतल्याचे सांगितले आहे.
इन्फोसिसने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, नोंदवलेल्या कोणत्याही समस्येची गंभीर दखल घेतली जाते आणि स्वतंत्र समितीद्वारे चौकशी केली जाते. कर्मचाऱ्यांना कोणतीही तक्रार मांडण्यासाठी ‘बोलून दाखवा' संस्कृतीला प्रोत्साहन दिले जाते. कंपनीने अंतर्गत प्रक्रिया आणि प्रतिबंधात्मक यंत्रणा सक्रिय केल्याचंही स्पष्ट केलं. दरम्यान, नाशिकमधील टीसीएस प्रकरणात २०२२ ते २०२६ दरम्यान अनेक महिला कर्मचाऱ्यांवर छळ झाल्याचे आरोप असून, आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. या तक्रारींमध्ये लैंगिक छळ, अयोग्य वर्तन, पाठलाग, मानसिक छळ तसेच सक्तीच्या धर्मांतराचे आरोपही समोर आले आहेत.
तपास यंत्रणांनी ४० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून, तक्रारदार आणि आरोपींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून, अंतिम निष्कर्षापूर्वी सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.