- मुंबई, कोकण आणि पुण्याच्या घाट भागात सतत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे
- पुण्यातील रावेत परिसरात 48 तासापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे
- वीज नसल्यामुळे विशेषतः लहान मुले, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे
सूरज कसबे
राज्यात सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यात मुंबई, कोकण आणि पुण्याच्या घाट माथ्यावर चांगलाच पाऊस होत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जनजिवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी ही झाल्याचं समोर आलं आहे. काही ठिकाणी तर पूर स्थिती निर्माण होवून नागरिक अडकले ही होते. पुण्यात ही पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. त्याचा फटका सर्व सामान्यांना बसला आहे. शहराच्या रावेत परिसरात तर गेल्या 48 तासांपासून बत्ती गुल आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांना अंधारात राहण्याची वेळ ओढवली आहे. लाईटच नसल्याने इथल्या स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी रात्रीच महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं.
रावेत, किवळे, विकासनगर, मुकाई चौक, चंद्रभागा कॉर्नर, बीआरटी रोडलगतच्या सोसायट्यांसह विविध भागांमध्ये लाईट गेली होती. एक दोन तास नाही तर तब्बल 48 तासांपासून या भागातला वीजपुरवठा खंडित झाला आहे. या परिसरात जवळपास पाच ते सहा हजार कुटुंबं राहातात. एकीकडे बाहेर पाऊस आणि घरात अंधार, अशा स्थितीत या लोकांना चाचपडत रहावं लागलं. वीज खंडीत का झाली आहे हे सुरूवातीला कुणालाच काही समजत नव्हतं. लाईट नसल्यामुळे नागरिकांचे हाल हाल होत होते.
लाईट नसल्यामुळे लहान मुले, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले. याची माहिती स्थानिक नगरसेवीका ऐश्वर्या तरस यांना देण्यात आली. एकीकडे लाईट नाही, दुसरीकडे महावितरणचा भोंगळ कारभार यामुळे त्या संतप्त झाल्या होत्या. त्यानंतर ऐश्वया यांच्यासह मावळ लोकसभा युवा सेनेचे अध्यक्ष राजेंद्र तरस यांनी रावेत येथील महावितरण कार्यालयासमोर थेट ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला. जोपर्यंत जबाबदार अधिकारी स्वतः येऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. यावेळी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला.
हजारो नागरिक अंधारात आहेत. महापालिका क्षेत्रात असं होत असेल तर ग्रामीण भागात काय असा प्रश्न ही त्यांनी केला. महावितरण कडून योग्य प्रतिसाद दिला जात नाही असा आरोप ही त्यांनी केला. शिवाय नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी प्रशासनाने तातडीने जागे होऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर काही भागात वीज पूरवठा पुर्ववत करण्यात आला. मात्र अजून ही काही भागात वीज येवू शकली नाही. तांत्रिक बिघाडामुळे हा वीज पुरवठा खंडीत झाल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे.