Pune Palkhi 2025 : राज्यभरातील वारकरी आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदी येथे दर्शनासाठी येत आहे. १८ जूनला देहूतून तुकाराम महाराजांची पालखी रवाना झाली आहे. तर आज सायंकाळी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होणार आहे. दरम्यान दोन दिवस दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असणार आहेत. दरम्यान आज पुण्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इंद्रायणी नदी आणि जाधववाडी तलावात भागात तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी येथून दूर राहावं असं आवाहन पुणे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
जाधववाडी तलाव आणि इंद्रायणी नदीत जाऊ नका...(Jadhavwadi Lake and Indrayani River)
पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जाधववाडी तलाव ९४.५३ टक्के भरला आहे. तो द्वार विरहित आहे. सद्यस्थितीत तुफान पावसामुळे धरणातील पाण्याचा जोर वाढल्यामुळे सुधा नदी (इंद्रायणी नदी) पात्रात वाढ होऊन कोणत्याही क्षणी जाधववाडी तलाव शंभर टक्के भरून अनियंत्रित विसर्ग सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मौजे जांबवडे, सुंदबरे, सुदवडी, देहू-आळंदी ते तुळापूरपर्यंतच्या सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या नदीपात्राजवळ न राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दिंडी सोहळ्याच्या अनुषंगाने देहू आणि आळंदी येथे आलेल्या भाविक वारकरी यांना नदीपात्रामध्ये जाऊ नये. ग्रामपंचायत, नगर पालिका व महापालिका यांना इंद्रायणी नदी अनियंत्रित विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुठा नदी पात्रात १९२० क्युसेकने विसर्ग सुरू... ( Mutha River )
इंद्रायणी नदी आणि जाधववाडी तलावासह मुठा नदीपात्रात पाण्याचा जोर वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आज दुपारी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. यापुढे पावसानुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाही नदीपात्रात उतरू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.