- मुंबई आणि उपनगरात रविवार सकाळी जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला
- सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, बोरीवली या उपनगरात तसेच घाटकोपर, विक्रोळी या पूर्व उपनगरात पावसाने हजेरी लावली
- ठाणे, कल्याण, पालघर या भागांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे
उष्णतेने सर्वच जण हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष पावसाकडे लागले होते. राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र मुंबईकरांना पावसाची प्रतिक्षा होती. त्याच वेळी रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी अल्हादायक ठरली. सकाळी सकाळी पावसाचे जोरदार आगमन झाले. मुंबई शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. सकाळी सकाळी झालेल्या पावसाने सर्वांनाचा आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
मुंबईत कुर्ला, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव,बोरीवली या पश्चिम उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर पूर्व उपनगरात घाटकोपर, विक्रोळी या पट्ट्यात चांगला पाऊस झाला. या शिवाय ठाणे, कल्याण, पालघर या भागात ही पावसाने हजेरी लावली होती. काही काळ जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सगळीकडे ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता. अनेक जण मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. त्यांच्यासाठी हे वातावरण सुखद ठरले.
आज रविवार असला तरी काही जण सकाळी कामावर निघाले होते. त्यांची मात्र तारंबळ उडालेली दिसली. पाऊस झाल्यानंतर मुंबईत सर्वात पहिला परिणाम उपनगरीय रेल्वेवर होतो. तसा आज मेगाब्लॉक आहे. असं असलं तरी पहिलाय पावसात तसा कोणताही परिणाम उपनगरीय लोकल सेवेवर झाला नाही. रेल्वे सेवा सुरळीत सुरू होती. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर लोकल वेळेवर धावत होत्या. मात्र पावसाचा जोर वाढला तर त्याचा परिणाम रेल्वेवर होण्याची दाट शक्यता आहे.