रिजवान शेख, प्रतिनिधी
Thane News : ठाण्यातील साकेत पूल आता नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या उपस्थितीत पुलाचे उद्घाटन झाले. पूल ४ लेनचा असला तरी पुढील रस्ता २ लेनचा असल्याने मुंबई–नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी अद्याप कायम आहे.
वाहतूक कोंडी सुटेना...
साकेत पूल कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून बांधण्यात आला आहे. नागरिकांची मोठी अपेक्षा होती की, या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. काही प्रमाणात वेळ वाचत असला तरी अडचण पूर्णपणे सुटलेली नाही. पुलावर ४ लेनची सोय आहे. मात्र पूल संपल्यानंतर सुमारे ३०० मीटरपर्यंत रस्ता फक्त २ लेनचा होतो. त्यामुळे तिथे वाहनांची गर्दी होते आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेषतः मुंब्रा बाजूला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, आधी माजीवाडा येथून महामार्गावर यायला १ ते १.५ तास लागत होते. आता साकेत पूल पार करायला २० ते २५ मिनिटे लागतात. पण पुलानंतर पुन्हा वाहतूक मंदावते. नागरिकांची मागणी आहे की, साकेत पुलानंतरचाही रस्ता ४ लेनचा करण्यात यावा. तसे झाल्यास भविष्यात मुंबई–नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळू शकतो.