Sanjay Raut PC: शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या आणि लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचालींवर अखेर ठाकरे गटाकडून अधिकृत आणि तितकीच आक्रमक प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन बंडखोर खासदारांना आणि विरोधी गटाला थेट इशारा दिला आहे. या पत्रकार परिषदेला खासदार अरविंद सावंत, अनिस देसाई आणि राजाभाऊ वाजे प्रामुख्याने उपस्थित होते.
"हे खासदार, आमदार किंवा अन्य कोणीही पूर्णपणे शिवसेना उबाठा (UBT) पक्षावर निवडून आले आहेत. आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आले असताना कोणालाही अशा प्रकारे बेईमानी करण्याचा अधिकार नाही," अशा कडक शब्दांत संजय राऊतांनी आपला संताप व्यक्त केला.
3 मिनिटांत 4 वेळा साईबाबांची शपथ
संजय राऊत यांनी 14 जून रोजी 'मातोश्री'वर झालेल्या खासदारांच्या नियमित बैठकीतील अत्यंत खळबळजनक प्रसंग माध्यमांसमोर मांडला. संजय राऊत यांनी म्हटलं की, "14 जून रोजी मातोश्रीवर नियमित बैठक झाली. तिथे अरविंद सावंत, अनिस देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय दिना पाटील प्रत्यक्ष हजर होते, तर उर्वरित खासदार व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते. त्या बैठकीत एका खासदाराने अवघ्या 3 मिनिटांत तब्बल 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली"
"माझी बायको आजारी आहे... साईबाबांची शपथ घेऊन सांगतो मी तुमच्यासोबतच आहे. मरेपर्यंत तुमच्यासोबत राहीन... साईबाबांची शपथ", असं म्हणत संजय राऊतांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर निशाणा साधला. एकाने आई भवानीची शपथ घेतली, तर कोणी आपल्या स्वतःच्या मुलीची आणि आईची शपथ घेतली की आम्ही पक्ष सोडणार नाही. एकाने तर थेट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे आम्हाला अनिवार्य होते, असंही संजय राऊत म्हणाले.
'पैसेही दिले आणि मेहनतही घेतली; आता सोडणार नाही!'
संजय राऊत यांनी बंडखोरांच्या कृत्यावर तीव्र आक्षेप घेत म्हटले की, ज्यांना घरातून पळून गेलेले लोक म्हणतात आणि जे तीन-तीन निवडणुका हरले होते, अशांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली, तिकीट दिले, स्वतः मेहनत घेतली आणि पक्षाने पैसेही दिले. तरीही हा तमाशा सुरू आहे. खासदारांना पैसे पोचले अशी मला माहिती आहे, त्यांनी पैसे घेतलेत. नंतर तीन जागांहून चार्टर्ड फ्लाईट सोडली.
जो राडा व्हायचा तो होईल
कोणी बेईमानी करेल तर याद राखा. मागे जे काही झालं त्याची पुनरावृत्ती झाली, तर महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. जो राडा व्हायचा तो होईल. ही डरपोकगिरी आणि नादानपणा आता खपवून घेतला जाणार नाही," असा थेट इशारा राऊत यांनी दिला.