महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपला संयुक्त उमेदवार निश्चित केला आहे. अनुभवी नेते शरद पवार हे आता मविआचे अधिकृत उमेदवार असतील. सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांशी केलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेसची 'राजकीय' अट
शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी काँग्रेसने एक महत्त्वाची अट ठेवली होती. भविष्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नसल्याची खात्री काँग्रेसला हवी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले की, "अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गटांमधील चर्चेचे दरवाजे बंद झाले आहेत. आता दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची शक्यता पूर्णपणे मावळली आहे."
विलीनीकरणाची शक्यता संपल्याचे स्पष्ट झाल्यावरच दिल्लीतून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खळगे यांनी शरद पवारांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला.
(नक्की वाचा- Iran Israel War: इराणमधील मिनाबच्या फोटोंनी जग हादरले, ट्रम्प यांची पुतणी देखील सुन्न)
ठाकरे गटाकडून हक्काच्या जागेचा त्याग
या राजकीय समीकरणामध्ये ठाकरे गटाने आपल्या हक्काच्या जागेचा त्याग केला आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आपली जागा शरद पवारांसाठी सोडल्यानंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या जागेच्या बदल्यात शिवसेनेला आता विधान परिषदेची (MLC) एक जागा दिली जाणार आहे, ज्याद्वारे उद्धव ठाकरे सदन निवडून येतील.
(नक्की वाचा- मुंबई-पुण्यानंतर राज्यभर धावणार 'शिवनेरी'! 'या' 8 नवीन मार्गांवर सुरू होणार सेवा)
निवडणुकीचे गणित
राज्यसभेच्या एका जागेसाठी 37 मतांची आवश्यकता आहे.
- महायुती (228 आमदार): 6 जागा सहज निवडून येतील. (रामदास आठवले, विनोद तावडे, माया ईवनाते, रामराव वडकुते व इतर).
- मविआ (46 आमदार): शिवसेना-29, काँग्रेस-16 आणि शरद पवार गट-10. या संख्याबळावर केवळ एकच जागा जिंकणे शक्य आहे, ज्यावर आता शरद पवार निवडणूक लढवतील.