विशाल पाटील, मुंबई
Mumbai News : शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही मागील काही दिवसातली दुसरी भेट आहे. राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यात बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मनसे आणि शिवसेनेत युतीबाबत गांभीर्याने चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांनी स्वागताचा बुके अजूनही घेतला नसल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीतील चूक टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे.
(नक्की वाचा- India vs Pakistan : दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका आता वेगळे नाही : CM देवेंद्र फडणवीस)
विधानसभेतील ती चूक कोणती?
विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीबाबत योग्य चर्चा झाली नसल्यामुळे दादर आणि वरळी विधानसभेमध्ये घोळ दिसून आला होता. दादर विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना शिवसेनेने सदा सरवणकर यांना ऐन वेळेस तिकीट दिले.
यानंतर राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष दिसून आला होता. युतीबाबत आणि जागा वाटपाबाबत योग्य चर्चा झाली नसल्याचा आरोपही करण्यात आला. आता पुन्हा महापालिका निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यावेळी जागा वाटपाबाबत कोणतीही चुकीची चर्चा होऊ नये यासाठी दोन्ही राजकीय पक्ष आग्रही आहेत. चर्चेला मागच्या वेळेप्रमाणे उशीर होऊ नये यासाठीची खबरदारी दोन्ही राजकीय पक्ष घेत आहेत.