
कांडलाहून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेटच्या Q400 विमानात एक मोठी दुर्घटना टळली. 12 सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी उड्डाण घेतल्यानंतर धावपट्टीवर विमानाचा एक बाहेरील टायर पडलेला आढळला. ज्यामुळे विमानात बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र त्याच वेळी वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमान मुंबईपर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हे विमान सुरक्षित उतरवण्याची जबाबदारी वैमानिकांवर येवून ठेपली होती. पण त्यांनी या स्थितीत ही धीर खचू दिला नाही. त्यांनी ते विमान मुंबईच्या दिशेने नेले. या विमानात 75 प्रवाशी होते.
विमान कांडलाहून मुंबईकडे वळवण्यात आले. त्यानंतर मुंबई विमानतळावर विमानाला सुरक्षितपणे उतरवण्यात वैमानिकांना यश आले. ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. यशस्वी लँडिंगनंतर, विमान स्वतःच्या ताकदीवर टर्मिनलपर्यंत गेले. सर्व प्रवासी सुरक्षितपणे उतरले. भविष्यात अशा घटना टाळता याव्यात यासाठी स्पाइसजेट आणि विमान वाहतूक प्राधिकरणांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
सीएसएमआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, कांडलाहून आलेले एक विमान तांत्रिक बिघाडाची सूचना मिळाल्यानंतर 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3:51 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करत होते. खबरदारी म्हणून पूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली होती. विमान धावपट्टी 27 वर सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षित आहेत. काही वेळाने सामान्य कामकाज पुन्हा सुरू झाले.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "कांडला एटीसीला काहीतरी पडताना दिसले. उड्डाणानंतर त्यांनी पायलटला याची माहिती दिली. पडलेली वस्तू आणण्यासाठी एटीसी जीप पाठवण्यात आली." एटीसी टीम तिथे पोहोचली तेव्हा जमिनीवर धातूच्या कड्या आणि एक चाक आढळले. त्यामुळे याची माहिती ही पायलटला देण्यात आली. विमान जो पर्यंत सुरक्षित लँड होत नाही तोपर्यंत सर्वांचा जीव मुठीत होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world