Parking Problem in Maharashtra : वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण होत आहे. राज्य सरकारनं हा प्रश्न सोडवण्याची पुढाकार घेतला आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी "एकात्मिक पार्किंग धोरण "आणण्याचा विचार परिवहन खाते करत आहे. या धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये(MMRDA) करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते या संदर्भात बोलावलेल्या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मधील महापालिका आयुक्तांच्या बैठकीमध्ये बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रस्ताव?
सरनाईक यावेळी म्हणाले की, एकात्मिक पार्किंग धोरण आणण्या अगोदर त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कोणती त्रुटी राहू नये यासाठी ज्या महापालिका क्षेत्रामध्ये या समस्याने उग्र रूप धारण केले आहे, त्या महापालिका आयुक्तांच्या सूचना, अभिप्राय यांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल तर ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने उपलब्ध करून देणे गरजेचे असून त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रामध्ये अशा पार्किंग जागा विकसित करण्याला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.
त्या अनुषंगाने राज्यासाठी पार्किंग धोरण तयार करत असताना सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या महापालिकांमध्ये प्रभावीपणे राबवावे असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवले आहे, त्यानुसार ही बैठक बोलण्यात आली होती.
( नक्की वाचा : Pune News : जमीन मोजणीचा भलताच 'मुळशी पॅटर्न'... शेतकऱ्यावर वडिलोपार्जित घर गमावण्याची वेळ )
या बैठकीमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये पार्किंगच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचना तसेच अभिप्राय यांचा येणाऱ्या पार्किंग धोरणामध्ये समावेश केला जाईल.'
महापालिकेला सूचना
यावेळी बोलताना सरनाईक पुढे म्हणाले की, प्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्यान आणि मैदानाच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीने रचना करावी. ठाणे महापालिकेने मैदानाच्या खाली तयार केलेले वाहनतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलीस प्रशासन व मोटार परिवहन विभागाच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करावी. रस्त्यावर अनेक वर्ष बंद असलेली वाहने तातडीने टोईंग करून हलवण्यात यावीत, रस्ते मोकळे करावेत. तसेच विकास आणि सुविधासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्यात यावेत यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर महापालिकांनी स्विकारावे. त्यामुळे भविष्यात शहराची पार्किंग समस्या कमी होण्यास मदत होईल.