Stray Dogs Problem In Nagpur : नागपूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतीच शहरातील त्रिमूर्ती नगर परिसरात एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर 4 ते 5 मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ती मुलगी गंभीर जखमी झाली आणि रक्तबंबाळ झाली. वेळीच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी धाव घेतली नसती, तर मोठा अनर्थ घडला असता. अशा घटना नागपूरकरांसाठी नवीन नाहीत, कारण शहरात दर आठवड्याला अशा अनेक घटना घडत आहेत. गेल्या सहा महिन्यांत एकट्या नागपूर शहरात श्वानदंशाच्या 5 हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे.
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी गेल्या 19 वर्षांपासून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर एक जनहित याचिका प्रलंबित आहे. या याचिकेवर न्यायालयाने वेळोवेळी अनेक आदेश दिले आहेत, मात्र तरीही कुत्र्यांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारी समस्या कमी होण्याऐवजी दहा पटींनी वाढली आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
( नक्की वाचा : Stray Dogs : 4 वर्षाची चिमुरडी घराबाहेर खेळत होती... अचानक भटक्या कुत्र्यांनी घातली झडप! नागपूर हादरले )
‘झारीचे शुक्राचार्य कोण?'
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आता सवाल केला आहे, की महानगर पालिकेच्या आणि पोलिस खात्याच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी आदेशांचे आणि नियमांचे पालन केले नाही? खंडपीठाने त्यांची यादी मागवली असून त्याचेवर कारवाईचा इशारा दिला आहे.
या याचिकेतील याचिकाकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते विजय तालेवार यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना या प्रकरणावर आपले परखड मत मांडले. त्यांनी महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, अधिकारी केवळ प्रतिज्ञापत्र दाखल करून आपली जबाबदारी झटकतात.त्यांनी कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.
महापालिकेतील अधिकाऱ्यांनी त्यांच्याच एनजीओला नसबंदीचे काम दिले आणि त्यात अडीच कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले. नसबंदीचे काम योग्य प्रकारे झाले नाही. काही ठिकाणी तर नसबंदी न करताच कुत्र्यांचे कान कापून त्यांना सोडून देण्यात आले, असा दावा त्यांनी केला.
( नक्की वाचा : Parbhani News : भूकंप, ज्वालामुखी की आणखी काही, परभणीतल्या शेतातून वाफ येण्याचं कारण समजलं! )
कुत्र्यांची संख्या 1 लाखाहून अधिक
तालेवार यांनी सांगितलं की, '2008 साली नागपूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या 10 हजार होती, ती आज 2025 मध्ये 1 लाखाहून अधिक झाली आहे. नसबंदीचे काम योग्य प्रकारे झाले असते, तर कुत्र्यांची संख्या दहा पटींनी कशी वाढली, असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. यावरून प्रशासनाला उच्च न्यायालयाचीही भीती राहिली नाही, असे ते म्हणाले. हा खटला पुढील 25 वर्षे चालेल, याची अधिकाऱ्यांना खात्री असल्यामुळे ते आदेशांची अंमलबजावणी करत नाहीत,' असा आरोप त्यांनी केला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कुत्रा चावल्यास कोणत्या कलमाखाली एफआयआर दाखल करावा, याची पोलिसांना माहिती नाही, असे तालेवार यांनी सांगितले. प्राणीमित्र म्हणवणाऱ्या संघटनांवरही त्यांनी टीका केली. त्या संघटना केवळ आक्षेप घेतात, पण जबाबदारी घेत नाहीत. शहरातील सर्व श्वानप्रेमींनी मोकाट कुत्र्यांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘मी गॅरंटी देतो, दिल्लीचा एकही मोकाट कुत्रा हलणार नाही,' असे सांगत त्यांनी दिल्लीतील प्राणीमित्र मेनका गांधी यांच्यासारख्या नेत्यांवरही टीका केली.
'अधिकाऱ्यांनी लोकांना कुत्रे बनवले'
तालेवार यांनी या विषयावर बोलताना आरोप केला की, "अधिकाऱ्यांनी लोकांना कुत्रे बनवले आहे." त्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, '' वाघ नरभक्षी झाला, तर त्याला मारण्याची परवानगी घेतली जातेच ना? मग माणसांच्या, विशेषतः लहान मुलांच्या जीवांना किंमत नाही का?"