अमजद खान
तीन वर्षाच्या मुलीला साप चावला. परंतू ती बोलू शकली नाही की तिच्या सोबत नेमके काय झाले आहे? जेव्हा त्या मुलीच्या मावशीला सापाने चावा घेतला, तेव्हा घरच्याना कळले की, तीन वर्षाच्या प्राणवी हिच्यासोबत काय घडले आहे. मुलीला आणि मावशीला केडीएमसी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. आधी डॉक्टरांनी सांगितले आत्ता तब्येत व्यवस्थित आहे. मात्र मुलीची तब्येत खालावली. तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यापूर्वीच शास्त्रीनगरच्या प्रवेश द्वारावरच तिने प्राण सोडला. साप चावल्यावर केडीएमसीच्या रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाहीत. तसेच पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे, असा गंभीर आरोप तिच्या पालकांनी केली आहे.
डोंबिवलीतील आजदे गावात विक्की भोईर राहतात. ते मंडप डेकोरेशनचे काम करतात. अनेक दिवस झाल्याने त्यांची पत्नी माहेरी गेली नव्हती. त्यामुळे त्यांनी पत्नी आणि मुलीला त्यांच्या माहेरी म्हणजेच खंबाळपाडा येथे पाठविले होते. तीन वर्षाची मुलगी प्राणवी ही सोबत गेली होती. माहेरी गेल्यानंतर रात्रीच्या वेळी प्राणवी तिच्या मावशीजवळ झोपली होती. ती अचानक जोरजोरात रडू लागली. त्या आवाजाने तिच्या मावशीची झोप उडाली. रडत असलेल्या प्राणवीला तीने तिच्या आईकडे दिले.
पण प्राणवीचे रडणे थांबतच नव्हते. थोड्याच वेळात सापाने तिच्या मावशीला ही चावले. नंतर लक्षात आले की, प्राणवीला देखील सापानेच चावले असेल. घरच्यांना माहिती मिळताच त्यांनी प्राणवी आणि तीच्या मावशीला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी सांगितले की, दोघी व्यवस्थीत आहेत. परंतू एक तासाच्या उपचारा दरम्यान प्राणवीची तब्येत आणखी बिघडली. तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.
पण तिला हलविण्यापूर्वीच शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच तिचा मृत्यू झाला. तिच्या मावशीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलीच्या मृत्यूनंतर पालकांसह नागरीकांनी केडीएमसी रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप केला आहे. मुलीला पुढील उपचारासाठी वेळीच दुसऱ्या रुग्णालयात हलविले असते तर तिचा मृत्यू झाला नसता. एका गोड मुलीचा अशा प्रकारे मृत्यून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.