- India's first musical road in Mumbai faces complaints from over 650 families in Breach Candy
- The road plays AR Rahman's Jai Ho from 6 am to midnight, disturbing residential areas
- Concerns raised about auditory distraction on a high-speed road and civic neglect of other issues
Mumbai Musical Road : मुंबई कोस्टल रोडवरील विशेष संगीत पट्ट्या वादात सापडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचं सांगण्यात आलं होतं. मुंबईच्या कोस्टल रोडवरील येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांना जय हो या गाण्याचा आवाज ऐकू येत आहे. मात्र भारतातील हा पहिला प्रयोग रहिवाशांना त्रासदायक ठरत आहे.
सततच्या आवाजाचा त्रास, स्थानिक वैतागले...
या मेलडी रोडला अवघा एक आठवडा झाला आहे. त्यातच ब्रीच कँडीच्या रहिवाशांकडून या मेलडी रोडला विरोध केला जात आहे. सतत वाजणाऱ्या गाण्यामुळे त्रास होत असल्याचं या रहिवाशांचं म्हणणं आहे. ब्रीच कँडी परिसरातील ६५० कुटुंबीयांनी सांगितलं, सकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशीरपर्यंत या रस्त्यावर गाणी सुरू असतात. या रस्त्यावरुन सतत गाड्याची वर्दळ असते. त्यामुळे सतत गाणं वाजत असतं. या आवाजाचा आम्हाला त्रास होतो. या परिसरात शाळा आणि रुग्णालयं असून रात्रीच्या वेळी आवाज स्पष्ट ऐकू येतो. त्यामुळे घराच्या खिडक्याही उघड्या ठेवता येत नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. परिणामी रहिवाशी संघटनेने पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे.
संगीत रस्त्यांची संकल्पना पहिल्यांदा २००७ मध्ये जपानमध्ये अभियंता शिझुओ शिनोदा यांनी विकसित केली होती. त्यानंतर हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या देशांमध्ये असेच प्रयोग राबवले गेले आहेत.