Raj-Uddhav-Fadnavis Love Triangle: गणेशोत्सवाच्या धामधुमीत महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळंच समीकरण पाहायला मिळालं आहे. राजकारणातील दोन मोठे प्रतिस्पर्धी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकाच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. या भेटींमुळे राज्याच्या राजकारणात एक नवा 'प्रेमाचा त्रिकोण' (लव्ह ट्रँगल) सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गणपतीच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
गेल्या 22 वर्षांपासून राजकीय आणि कौटुंबिकदृष्ट्या दूर असलेले चुलत बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गणपतीच्या निमित्ताने एकत्र आले. मंगळवारी सकाळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट दिली. तब्बल 2 तास दोन्ही कुटुंबीय एकत्र होते. यावेळी त्यांनी गणपतीची पूजा आणि आरती केली. माध्यमांपासून दूर राहत ठाकरे बंधूंनी केवळ फोटो शेअर केले. राजकीय चर्चा टाळत त्यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचे संकेत दिले.
सीएम फडणवीस यांचीही 'शिवतीर्थ'ला भेट
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर काही तासांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले. त्यांनीही गणरायाचं दर्शन घेतलं. या भेटीनंतर सीएम फडणवीस यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीचं स्वागत केलं. 'हे नातं राजकारणाच्या पलीकडचं आहे,' असं सांगत त्यांनी या भेटीला धार्मिक आणि कौटुंबिक रंग दिला. फडणवीस यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
( नक्की वाचा : Manoj Jarange Patil : 'जरांगे फॅक्टर' पुन्हा चर्चेत! कोण करतं नियोजन, पडद्यामागील 8 कारभारी माहिती आहेत? )
BMC निवडणुकीची समीकरणं बदलणार?
राज-उद्धव-फडणवीस यांच्या या भेटीमुळे आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीची समीकरणं बदलणार का, हा प्रश्न आता विचारला जात आहे. उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे गट एकत्र येऊन बीएमसी निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, पण अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे, फडणवीस यांची राज ठाकरे यांच्यासोबतची जवळीक शिंदे गटासाठी अडचणीची ठरू शकते. राज ठाकरे मराठी मतांमध्ये फूट पाडू शकतात, ज्यामुळे शिंदे गटाच्या काही जागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मनसेचा मर्यादित प्रभाव पण ‘खेळ बिघडवण्याचा' इरादा
महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मनसेच्या मर्यादित प्रभावावर प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणाले की, 2009 मध्ये मनसेला विधानसभेत 13 जागा आणि 5.7% मतं मिळाली होती, पण त्यानंतर त्यांचा आलेख घसरत गेला. 2014 आणि 2019 मध्ये त्यांना फक्त 1-1 जागा मिळाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तर मनसेला एकही जागा जिंकता आली नाही.
तरीही, राजकीय विश्लेषकांच्या मते, राज ठाकरे हे 'गेम चेंजर' ठरू शकतात. मुंबईतील 227 जागांसाठी होणाऱ्या बीएमसी निवडणुकीत ते जरी काही जागा जिंकू शकले नाहीत तरी, मराठी मतांमध्ये मोठी फूट पाडण्याची त्यांची क्षमता आहे. यामुळे कोणाचं नुकसान होणार, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
सध्या तरी राज-उद्धव-फडणवीस यांच्या या 'प्रेमाच्या त्रिकोणाचं' नेमकं कारण काय, हे सांगणं अवघड आहे. राजकारण आणि कौटुंबिक संबंध यांच्यातील या गुंतागुंतीच्या नात्याला समजून घेण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल.