Jayant Patil : राज्यभर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा एक हंगाम वाया गेला आहे. लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचं आवाहन सरकारला केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जयंत पाटलांनी ट्वीट करत म्हटलं की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई भरपाई द्या, नाहीतर त्यांचे भवितव्य धोक्यात येईल. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अवकाळी पावसाने टोमॅटोचे प्रचंड नुकसान झाले आहे. एक शेतकरी महिला रडत सरकारकडे मदतीची मागणी करत असल्याचा व्हिडिओ काही माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ जयंत पाटील यांनी देखील शेअर केला आहे.
(नक्की वाचा- Maharashtra Politics: 'शेतकऱ्यांवर कुऱ्हाड, सरकारला ढेकळं हाणा...', 'त्या' निर्णयानंतर ठाकरे गटाचा संताप)
हा व्हिडिओ शेअर करत जयंतराव पाटील म्हणाले की, अवकाळी पावसाने टोमॅटो उत्पादकांची झालेली ही अवस्था अतिशय अस्वस्थ करणारी आहे. कर्जाऊ पैसे घेऊन बाग फुलवली मात्र हातातोंडाशी आलेला घास मातीत मिळाला आहे. दुर्दैवाने कमीअधिक प्रमाणात अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने प्रत्येक शेतकऱ्याची केली आहे.
(नक्की वाचा - 'नदी वाचवायचं नाटक भारी...',मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यावरून ठाकरेंना शिवसेनेचा ठाकरेंवर निशाणा)
झालेल्या नुकसानाची सरकारने संवेदनशीलतेने दखल घ्यावी. त्वरित नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना धीर द्यावा. अन्यथा त्यांचे भवितव्य धोक्यात येईल, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.