Mumbai News : मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणी बाग) येथील मांसाहारी प्राण्यांच्या आहारासाठी महापालिका तब्बल ६१ लाखांहून अधिक खर्च करणार असून यावरून बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा रंगली आहे. मुंबईतील राणीच्या बाग दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. लहान मुलांसाठीही तर राणीची बाग पर्वणीच असते. सध्या राणीच्या बागेत विविध प्रकारचे प्राणी आहेत. त्यांच्या आहारासोबत संगोपनाकडेही विशेष लक्ष दिलं जातं.
राणीच्या बागेतील वाघ, बिबट्या, तरस, कोल्हा यांसाठी दररोज सुमारे ५०–६० किलो मांसाची गरज असते. त्यांच्यासाठी म्हैस आणि रेड्याचं मांस पुरवलं जातं. या मांसासाठी २६० रुपये प्रति किलो दराने पुरवठा केला जातो. वर्षभरासाठी एकूण खर्च ६१.७७ लाख रुपये असल्याचं समोर आलं आहे. कंत्राट संपल्यानंतर सध्याच्या कंत्राटदारालाच काही महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. बुधवारी स्थायी समितीसमोर संबंधित कंत्राटदाराच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताप महापालिका प्रशासनातर्फे मांडण्यात आला.
प्राणीसंग्रहालयाचे स्वरूप
सध्या राणीच्या बागेत २१ पेंग्विनसह विविध प्रकारचे प्राणी आहेत. यात ८४ सस्तन प्राणी आणि १५७ पक्षी आहे. याशिवाय राणीच्या बागेत २५६ प्रजाती आणि ६६११ वृक्ष-वनस्पतींचा समावेश आहे.
प्राण्याच्या आहाराबाबत स्थायी समितीत मोठी चर्चा रंगली. यावेळी नगरसेविका यामिनी जाधव यांनी हे कंत्राट एक वर्षाऐवजी पाच वर्षांसाठी द्यावे अशी मागणी केली. तर शीतल गंभीर यांनी देवनार पशुवधगृहातून मांस खरेदीचा पर्याय सुचवला. मात्र तेथे मांस विक्री होत नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. मांस पुरवठा खरोखर प्राण्यांपर्यंत पोहोचतो का? असा सवाल ट्युलिप मिरांडा यांनी उपस्थित केला. राणी बागेतील माकड कुपोषित दिसतात, असंही त्या पुढे म्हणाल्या.
प्राण्यांच्या आहारासाठी मोठा खर्च होत असतानाच त्यांच्या आरोग्य व पोषणावर उपस्थित झालेले प्रश्न महापालिका प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत