- विनायक राऊत यांनी सून गिरिजा राऊत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत
- गिरिजा आणि गितेश राऊत गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळे राहत असल्याचे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे
- गिरिजा यांनी गितेश कडून मोठ्या आर्थिक नुकसान भरपाईसाठी नोटीस दिली आहे
सून गिरिजा राऊत यांनी आरोपांची छडी लावल्यानंतर आता विनायक राऊत ही माध्यमां समोर आले आहेत. त्यांनी गिरीजा यांनी केलेला आरोप फेटाळून लावले आहेत. गिरिजा आणि गितेश गेल्या तिन वर्षा पासून एकत्र राहत नाहीत असं सांगितलं. शिवाय जर गिरिजा सोबत अघोरी प्रकार झाले होते तर त्याच वेळी तिने तक्रार का केली नाही. तिला कोण अडवत होतं असा प्रश्न केला आहे. हे प्रकार सुरू असताना तिचे आई वडील ही तिच्या सोबत असल्याचं तिने स्वत: कबुल केलं आहे मग त्यांनी तिला का अडवलं नाही असे काही प्रश्न उपस्थित केले आहे. त्याच बरोबर या मागे गिरिजाला आमच्याकडून मोठी रक्कम उकळायची होती. त्यासाठी आम्ही तयार नव्हतो त्यामुळे ही खोटी तक्रार तिने केल्याचा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
गिरिजा हीने गितेशला एक नोटीस पाठवली होती. त्यात तिने 10 कोटींची नुकसान भरपाई मागितली होती. पाच लाख रूपये दरमहा द्यावे असं सांगितलं होते. शिवाय थ्री बीएचके टेरेस फ्लॅट आणि एक कार मागितली होती. असं राऊत यांनी सांगितलं. ही मागणी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही ती फेटाळून लावली होती. दोन्ही बाजूचे वकील याबाबत मध्यस्थी करत होते. पण तोडगा निघाला नाही. आम्ही तिची ही मोठी मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे आकसाने तिने आमच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे असं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ती कोर्टात गेली आहे. आम्ही ही कोर्टात गेलो आहोत. त्यामुळे जो निर्णय होईल तो कोर्टात होईल असं ही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान गिरिजावर कोणते ही अघोरी प्रकार केले नाहीत असं ही राऊत म्हणाले.
विनायक राऊत यांच्यानंतर गिरीजा राऊत यांची ही पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी राऊतांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. जर राऊत यांच्याकडून पैसे उकळायचे असते तर मी त्याच्या घरात ज्यावेळी राहत होती त्याच वेळी तसं केलं असतं. पण मी तसं केलं नाही. माझ्या खूप साध्या अपेक्षा होत्या. मला आनंदाने नांदायचे होते. आज ना उद्या काही तरी चांगलं होईल अशी अपेक्षा होती. पण तसं काहीच झालं नाही. उलट माझा छळ केला गेला असं गिरिजा यांनी यावेळी सांगितलं. शिवाय अघोरी कृत्य करताना राऊत हे स्वत: हजर होते असं ही त्यांनी सांगितलं. त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून गितेश किंवा आपल्या सासूला काहीच सांगितलं नाही. उलट ते आपल्यालाच कसं वागायचं हे सागंत होते.
विनायक राऊत यांना सुरूवातीपासूनच आपला मुलगा शरीर संबंधासाठी सक्षम नाही हे माहित होतं. त्यांनी ते आमच्या पासून लपवलं. त्यामुळे त्यांनी गरिब घरातील मुलीशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. साध्या सरळ कुटुंबाची त्यांनी फसवणूक केली असा आरोप गिरिजा यांच्या वकीलांनी केला आहे. हे कुटुंब आपल्या विरोधात उभं राहणार नाही. मुलाचा दोष त्या मागे दडवला जाईल असं त्यांना वाटत होतं असा आरोप ही केला. या प्रकरणी राऊत कुटुंबाला अटक झाली पाहीजे. अटक झाली नाही तर या प्रकरणाचा तपास होणार नाही असं ही त्यांचे वकील म्हणाले. हा गुन्हा अजामिन पात्र आहे. पण नोटीस देवून त्यात अटक टाळता येते असं ही त्यांच्या वकीलांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.