Kalyan News : मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) दळणवळण वेगवान करण्यासाठी आखण्यात आलेल्या 126 किमी लांबीच्या विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडोरमुळे कल्याणमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांना काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. कल्याणमधील शिधोण येथील म्हाडाच्या राखीव भूखंडातून हा मार्ग जाणार असल्याने परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पावर याचा परिणाम झाला आहे.
नेमके प्रकरण काय?
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) 63,618 कोटी रुपयांचा हा प्रकल्प राबवला जात आहे. कल्याणमधील शिधोण येथे म्हाडाचा एक मोठा भूखंड 'परवडणाऱ्या घरांसाठी' राखीव आहे. या जमिनीतून सुमारे 500 मीटर लांब आणि 100 मीटर रुंद पट्टा या कॉरिडॉरसाठी लागणार आहे. या प्रकल्पामुळे म्हाडाची अंदाजे 5 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाईल, ज्यामुळे म्हाडाचा मूळ भूखंड दोन भागात विभागला जाणार आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)
भरपाईची मागणी आणि घरांची स्थिती
म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जमिनीवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) प्रवर्गातील घरांचे नियोजन आहे. कोकण मंडळाने यापूर्वीच काही घरांची लॉटरी काढून विक्रीही केली आहे. रस्ते विकास महामंडळाला जमीन देण्यासाठी म्हाडा तयार आहे, मात्र त्या बदल्यात 50 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Sangli News: हृदयद्रावक! सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून तिघांचा मृत्यू; वाचवायला गेलेले 5 जणही गंभीर)
प्रकल्पाचे महत्त्व
2010 मध्ये संकल्पित केलेला हा कॉरिडॉर पालघर, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. यामध्ये रस्ता, रेल्वे आणि बस वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका असतील. यामुळे एमएमआर क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी होऊन नवीन व्यावसायिक केंद्रे विकसित होण्यास मदत होणार आहे.