Ulhasnagar Rain Viral Video : कल्याण-डोंबिवली,उल्हासनगर,अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता.या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचे पाणी घरांमध्ये,दुकानांमध्ये तसेच रस्त्यांवर शिरल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.उल्हासनगरमधील जिजामाता कॉलनी परिसरात नाला तुडुंब भरल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी एक आजीबाई त्यांच्या घरात अडकून पडल्या होत्या.पण त्यानंतर जे काही घडलं, ते पाहून सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
आजीबाईंचा जीव धोक्यात होता,पण घडलं असं..
घरात जवळपास तीन फूट पाणी साचल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य होत नव्हते.त्यामुळे आजीबाईंचा जीव धोक्यात होता. परंतु, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीनं बचावकार्य सुरू केलं आण त्या आजीबाईंची सुटका केली.अग्निशमन विभागाच्या या धाडसी कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आणि आजीबाईंनी अग्निशमन दलाचे आभार मानले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.