Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रभरातून मान्सूनची प्रतीक्षा केली जात आहे. तीव्र उकाड्यामुळे त्रासलेले नागरिक पावसाच्या थेंबासाठी आसुसले आहेत. दरम्यान हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध केली आहे. भारतीय हवामान विभागाकडून गुरुवारी पुढील दोन आठवड्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात कधी रिमझिम?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागात तुफान पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वसाधारणपणे ११ जूनच्या जवळपास मुंबईत मान्सून धडकतो. मात्र अद्याप केरळमध्ये मान्सूनची अधिकृत तारीख आलेली नाही. अशात यंदा मान्सूनची गती कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात कधी आणि कुठे होईल पाऊस?
हवामान विभागानुसार, ४ जूनपर्यंत महाराष्ट्राच्या किनारी भागात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी प्रतिदिवशी १० किलोमीटरपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर ४ ते ११ जूनदरम्यान कोकण आणि किनारी भागात पावसाची तीव्रता वाढू शकते. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यताही वाढू शकते. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, ३१ मे ते ३ जूनदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटाची शक्यता आहे.
हवामान विभागाने पुढे असंही सांगितलं की, पुढील आठवड्यात दक्षिण भारतातील काही भागात मान्सून हवा येऊ शकते. तर ४ ते ११ जूनदरम्यान कोकण आणि गोव्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
देशातील १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट...
दुसरीकडे हवामान विभागाने शुक्रवार, २९ मे रोजी देशातील १६ राज्यांमध्ये वादळी वारे, विजेच्या कडकडाटासग अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहारसह अनेक भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये वादळी वारे ताशी ९० किलोमीटर वेगापर्यंत वाहू शकतात. हवामान विभागानुसार, पुढील काही दिवसात उत्तर-पश्चिम भारत, राजस्थान, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशात तापमानात घट होऊ शकते, ज्यामुळे लोकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे.