बुलढाण्यात गुप्तधनासाठी 14 वर्षीय मुलाचा नरबळी? स्मशानात आढळल्या धक्कादायक गोष्टी

या घटनांमुळे पुरोगामी महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय आहे असा प्रश्न निर्माण होतो.

Advertisement
Read Time: 2 mins
बुलढाणा:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

एकविसाव्या शतकातही आपल्या आजूबाजूला अंधश्रद्धेच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अजूनही गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी द्यायलाही लोक मागे-पुढे पाहत नाहीत. या घटनांमुळे पुरोगामी महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय आहे असा प्रश्न निर्माण होतो. पैसे मिळवण्याच्या उद्देशाने बुलढाण्यात नरबळीचा प्रकार घडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा कराळे या 14 वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक गोष्टी उघडकीस आल्या. घटनेच्या दिवशी सकाळी कृष्णा नागझरी येथील रुपेश वारोकार या तरुणाच्या मोटार सायकलवर बसून कुठेतरी जात असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे हाच रुपेश वारोकर कृष्णाच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी कृष्णाच्या  कुटुंबीयांसोबत पोलीस स्टेशनमध्ये देखील हजर होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी रुपेशची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शेवटी आरोपीने कृष्णाची हत्या करून त्याचा मृतदेह भास्तनच्या जंगलात ठेवल्याची कबुली दिली. 

पैशांसाठी कृष्णाचा जीव घेतला?
कृष्णाचा गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. यानंतर हातोड्याने त्याच्या डोक्यावरही वार करण्यात आले होते. रुपेश वारोकार यानेच कृष्णाच्या हत्येची कबुली दिली आहे. हत्येनंतर त्याचा मृतदेह रानात फेकून देण्यात आला. दुसऱ्या दिवशी एका गावकऱ्याला रानात कृष्णाचा मृतदेह दिसला. त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. चौकशीअंती रुपेश वारोकार यानेच त्याची हत्या केल्याचं उघड झालं. कुटुंबीयांनी कृष्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. मात्र दुसऱ्याच दिवशी कृष्णाच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी स्मशानात लिंबू, हात-पाय तोडलेली बाहुली, धागे-दोरे, दारूची बाटली आणि पुजेचे साहित्य दिसून आले. 

Advertisement

नक्की वाचा - चोरट्यांची 'गटारी', कल्याणमधील वाईन शॉपवर चोरट्यांचा डल्ला

कृष्णाच्या अत्यंविधीच्या ठिकाणी लिंबू, धागे-दोरे आणि इतर पुजेचं साहित्य आढळून आल्याने ही हत्या अघोरी पुजेसाठी केल्याचं उघडकीस आलं. यामध्ये नरबळीचा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हे सर्व कोणी केलं याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. हत्या करणारा आणि स्मशानात पूजा करणाऱ्यांचा काही संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. आता या प्रकरणात राजकीय नेत्यांनी उडी घेतली आहे. हे प्रकरण फास्ट कोर्टात चालवण्याची मागणी जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजपा आमदार डॉ.संजय कुटे व आमदार आकाश फुंडकर यांनी केली आहे. आरोपीची नार्को टेस्ट करून सत्य कारण समोर आणण्याची मागणी उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे.

Advertisement