शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati News: अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खारतळेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत पत्नीला नेहमी मारहाण करणाऱ्या पतीचा, पत्नीने केलेल्या प्रतिमारहाणीत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादाचे पर्यावसान थेट हत्येत झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव मंगेश देविदास गोटे असून त्यांचे वय 42 वर्षे होते. मंगेश हे खारतळेगावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश यांना दारूचे मोठे व्यसन होते.
ते रोज दारू पिऊन घरी यायचे आणि विनाकारण पत्नीला शिवीगाळ करत असत. केवळ शिवीगाळच नाही, तर ते पत्नीला अमानुषपणे मारहाणही करायचे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने त्यांचे घरगुती वातावरण नेहमीच तणावपूर्ण असायचे.
( नक्की वाचा : Doctor Suicide: मैत्री, प्रेम आणि नंतर छळ...फौझीलनं स्तुतीला टोकाचं पाऊल उचलण्यास कसं भाग पाडलं? मोठा खुलासा )
नेमकं काय घडलं?
नेहमीप्रमाणे मंगळवारी म्हणजेच 10 मार्च रोजी मंगेश गोटे पुन्हा एकदा दारूच्या नशेत धुंद होऊन घरी पोहोचले. घरी आल्यावर त्यांनी पुन्हा पत्नीसोबत वाद उकरून काढला आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. रोजच्या या त्रासाला पत्नी पूर्णपणे कंटाळली होती. पतीकडून होणाऱ्या सततच्या मारहाणीमुळे तिचा संयम सुटला आणि संतापाच्या भरात तिने पतीला जोरदार प्रतिप्रत्युत्तर दिले.
रागाच्या भरात पत्नीने पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की, मंगेश गोटे यांचा जागीच मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच गावात आणि परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बुधवारी 11 मार्च रोजी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांची कारवाई आणि तपास
या घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी तातडीने तपास चक्रावली फिरवली. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पत्नीने स्वतःच पतीला मारहाण केल्याची कबुली दिली आहे. सततच्या त्रासामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. वलगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोलीस आता या घटनेचा अधिक सखोल तपास करत असून, नेमकी ही मारहाण कोणत्या कारणावरून टोकाला गेली आणि त्यावेळी नक्की काय घडले, याचा शोध घेतला जात आहे. एका व्यसनामुळे सुखी संसाराची राखरांगोळी झाल्याची चर्चा आता संपूर्ण अमरावती जिल्ह्यात सुरू आहे.