राज्यात मान्सून सुरू झाला असला तरी अद्यापही अपेक्षित गारवा आलेला नाही. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी कोणी एसी तर कोणी कुलरची मदत घेत असतात. मात्र याच कुलरमुळे एकाच कुटुंबातील माय लेकरांचा मृत्यू झाला आहे. कुलरमध्ये गारवा निर्माण करण्यासाठी त्यात पाणी टाकलं जातं. कुलरमध्ये पाणी टाकत असताना एका महिलेला शॉक लागला आणि यात तिच्यासह तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमरावतीमधील अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक येथे शनिवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. कुलरमध्ये पाणी टाकताना विद्युत शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती कामावरून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तोपर्यंत याबाबत कोणालाच काही माहिती नव्हती. या घटनेनंतर सरमसपुरा पोलीस यांनी घटनास्थळ गाठत घटनेची माहिती घेतली.
नक्की वाचा - Parbhani News: आईने 3 वर्षाच्या मुलाला ओढणीने कमरेला बांधलं अन् मारली नदीत उडी
सुमती लक्ष्मण कासदेकर (वय 35), श्वेता लक्ष्मण कासदेकर (वय 4) आणि विकी लक्ष्मण कासदेकर (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. तर दुसऱ्या खोलीत असलेली चार मुलं या घटनेत बचावली आहेत. लक्ष्मण कासदेकर यांना एकूण सहा अपत्य होती. दरम्यान, एकाचवेळी आईचा आपल्या दोन चिमकल्यांसह मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुलरमध्ये पाणी टाकताना ही घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेचा अधिकचा तपास अचलपूर मधील समरसपुरा पोलिस करत आहेत.