Akola News : निवडणुकीचं वातावरण बिघडलं, उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, लोखंडी पाईपने डोकं फोडलं

अकोल्याच्या अकोट नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरात तणाव वाढताना आज पहाटे एक मोठी घटना उघड झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला

Akola News : अकोल्याच्या अकोट नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरात तणाव वाढताना आज पहाटे एक मोठी घटना उघड झाली आहे. AIMIM पक्षाच्या प्रभाग क्रमांक 15 (अ) मधील अधिकृत उमेदवार उज्वला राजेश तेलगोटे यांचे पती राजेश तेलगोटे हे १ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी कालवाडी रोडवर गेले होते. रामनारायण फार्मजवळ पाठीमागून आलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी लोखंडी पाईपने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यात तेलगोटे गंभीर जखमी झाले. आरडाओरड करूनही मदतीस कुणीही धावले नाही. काही नागरिकांनी त्यांना गंभीर अवस्थेत अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांचा तपास सुरू; हल्ल्यामागील कारणांवर प्रश्नचिन्ह

यादरम्यान, घटनेची माहिती मिळताच अकोट शहर ठाण्याचे ठाणेदार अमोल माळवे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे. हल्लेखोर कोण होते? हल्ल्यामागे नेमका हेतू काय? निवडणुकीच्या आदल्या दिवशी असा प्राणघातक हल्ला का झाला? या सर्व प्रश्नांवर शहरात मोठी चर्चा रंगत आहे. राजेश तेलगोटे यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हालचाली आणि संभाव्य संशयितांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

नक्की वाचा - CM on Election Postponed: "निवडणूक आयोग कुणाचा सल्ला घेतंय माहीत नाही", निवडणुका रद्द झाल्याबद्दल CM फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी

Advertisement

दोन दिवसांत दोन मोठ्या घटना; अकोटमध्ये निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले

अकोट नगरपरिषद क्षेत्रात केवळ दोन दिवसांत घडलेल्या घटनांमुळे वातावरण आणखी ढवळून निघाले आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या प्रभाग क्रमांक 4 (ब) च्या उमेदवार अलमास परवीन शेख सलीम यांचा तोंडगाव (अमरावती) येथे दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आज AIMIM उमेदवारांच्या पतीवर हल्ल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती व संभ्रम पसरला आहे. निवडणुकीला अवघा एक दिवस असताना सलग दोन गंभीर घटना घडल्याने अकोट नगरपरिषद निवडणुकीला ग्रहण लागल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे.