Akshay Shinde Encounter : बदलापूरमधील चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणतील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊन्टर करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांना अक्षय शिंदे याची ट्रान्झिट रिमांड मिळाली होती. तळोजा तुरुंगातून त्याला ठाणे पोलीस घेऊन जात होते. मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या. त्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूनंतर लगेच त्याच्या आईनं 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्स्कुल्झिव्ह प्रतिक्रियेत मोठा आरोप केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अक्षयला चिठ्ठी कुणी दिली ?
मुख्य आरोपी अक्षय शिंदेची गोळीबाराच्या काही तास आधी तुरुंगात भेट झाल्याची माहिती अक्षयच्या आई-वडिलांनी दिली. आम्ही दुपारी त्याला भेटायला गेलो होतो. ३ वाजता यायला सांगितलं. साडेतीन वाजता भेट झाली. चार्जशीट आली आहे असं अक्षयने सांगितलं. त्याने मला विचारलं की मला केव्हा सोडणार ?मी त्याला सांगितलं एक महिना थांबावं लागेल.
अक्षयला कोणीतरी चिठ्ठी लिहून दिली होती. ती त्याच्या खिशात होती. तो दाखवत होता, मात्र मला काही दिसलं नाही. इकडच्याच मुलांनी ती दिल्याचं त्याने सांगितलं होतं. त्याला वाचता येत नाही, अर्धवट शाळा शिकलाय त्यामुळे चिठ्ठीत काय लिहिलं होतं ते त्याला माहिती नव्हतं. त्याने मला वाचायला दिली होती. तीनवेळा आम्ही भेटलो होतो. त्याने मला सांगितलं की मी हा गुन्हा केलेला नाही. मी त्या मुलींना बोटही लावलं नाही असं त्याने म्हटलं होतं. तळोजा जेलमध्ये गेल्या सोमवारी पोलिसांनी भरपूर मारलं असं अक्षयने सांगितलं. माझ्या मुलाला फटाकेही फोडता येत नाही. पैसे देऊन त्याला मारून टाकलंय, असा दावा अक्षयच्या आईनं केलाय.
अक्षयच्या आईनं केलेल्या दाव्यामुळे त्याला तुरुंगात चिठ्ठी कुणी पाठवली? त्यामध्ये नेमकं काय होतं हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
( नक्की वाचा : Akshay Shinde Encounter नंतर हैदराबादमधील प्रकरण चर्चेत, 5 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? )
'पोलिसांनी मारलं'
आम्ही त्याला विचारलं कसा आहेस ? जेवण देतात का विचारलं. पोलिसांनी पायाला मारलं बोटं फोडल्याचे त्याने सांगितले. त्याला कपडे नेले होते, ते देखील त्याला देता आले नाहीत. मी सांगितलं की चिठ्ठी देऊन कोणीतरी फसवत असेल ती फेकून दे, असं अक्षयची आई यावेळी म्हणाली.
आम्हालाही मारुन टाका....
कितीही बोला, माझ्या पोराला फसवून मारून टाकलंय. आम्हालाही मारून टाका. आम्हालाही जगायचे नाहीये. आम्ही इथे तिथे भटकतोय. गावातल्या लोकांनी आम्हाला मारलं. अन्न-नाही पाणी नाही, अशी प्रतिक्रियाही अक्षयच्या आईनं दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world