Dombivali News : डोंबिवलीमध्ये ठाणे आणि डोंबिवलीला जोडणारा मोठा गाव मानकोली उड्डाणपूल चार चाकी वाहनांच्या रेसिंगच्या अड्डा बनला आहे. चार चाकी चालकांच्या या जीवघेणी शर्यतीमुळे अन्य वाहन चालक आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत त्वरित कारवाईची मागणी भाजपचे दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.
डोंबिवलीमधील ठाणे - डोंबिवली प्रवास कमी वेळात व्हावा यासाठी कल्याण खाडीवर कोट्यवधी रुपये खर्च करून मोठा गाव मानकोली उड्डाणपूल तयार करण्यात आला. हजारोंच्या संख्येने ज्या उड्डाणपुलावर लोक दुचाकीने प्रवास करतात. हाच पूल मद्यपी आणि स्टंटबाज तरुणाचा अड्डा झाला आहे. स्टंटबाज तरुण या पुलावर हैदोस घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या पुलावर दारू पार्टी तर सुरूच होती आता या पुलावर चार चाकी गाड्यांच्या रेसिंग देखील सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका झाला आहे.
एवढंच नाही तर मद्यधुंद अवस्थेत तरुणांकडून प्रवास करणाऱ्या तरुणींची छेड काढली जाते. याबाबत वारंवार कारवाईची मागणी केली जात आहे. परंतु याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत भाजपाचे दीपेश म्हात्रे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
नक्की वाचा - Matheran News : 10 फेब्रुवारीपासून माथेरानमध्ये स्थानिकांसह पर्यटकांची होणार कोंडी
यामध्ये त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष ठोंबरे यांना यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय दीपेश म्हात्रे यांनी रेसिंग करणाऱ्या स्टंट बाज तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता पोलीस कारवाई कधी करणार? करणार की नाही करणार हे देखील पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.