ज्या आईने पतीच्या मृत्यूनंतर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली, त्याच आईच्या हत्येचा कट तिच्या सर्वात जवळच्या नात्याने रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस तपासातून समोर आलेली माहिती कोणत्याही क्राइम थ्रिलरपेक्षा कमी नाही. २३ वर्षीय आयुषीने आपली विधवा आई नीरज शर्माची हत्या केली. आईची संपत्ती आणि अनुकंपाच्या आधारावर सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तिने आईला संपवलं. राजस्थानमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तीन महिने हत्येचं प्लानिंग...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या कोणत्याही रागातून किंवा वादातून केलेली नाही. यामागे तीन महिन्यांचं प्लानिंग होतं. प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक उचलण्यात आलं होतं. हत्येच्या प्लानिंगमध्ये अनेकांना जोडण्यात आलं, गाडीची सोय केली आणि हत्या ही हत्या न वाटता रस्ते अपघात वाटावा याची पूर्ण तयारी करण्यात आली होती.
वडिलांच्या मृत्यूनंतर नोकरीचं आमिष...
नीरज शर्मा यांचे पती विजय कुमार शर्मा न्यायालयात एलडीसी होते. एक वर्षांपूर्वी त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब आर्थिक संकटात सापडलं होतं. अनुकंपाच्या आधारावर नीरज यांना सरकारी नोकरी मिळाली. पोलिसांच्या दाव्यानुसार, आयुषीला या नोकरीचं आमिष होतं.
सरकारी नोकरी आणि संपत्तीवर नजर...
आईचा मृत्यू झाला तर सरकारी नोकरी यासोबत आईच्या नावावरील संपत्तीही मिळेल असं आयुषीला वाटत होतं. या लालसेतून तिने असा मार्ग निवडला ज्यामुळे आई-लेकीच्या नात्याला कलंक लागला.
काका आणि भावाच्या मदतीने रचला कट...
आयुषीने तिचे काक मोहन स्वरुप आणि काकांचा मुलगा बलराम यांच्यासोबत एकत्र येत हत्येचा प्लान आखला. सुरुवातीला अनेक पर्याय शोधण्यात आले. शेवटी नीरज यांची हत्या रस्ते अपघातात करण्याचं ठरलं. सुरुवातीला एक एसयुव्ही भाड्याने घेण्यात आली. त्यातून अपघात करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हा प्लान यशस्वी होऊ शकला नाही. यानंतर दुसऱ्या गाडीचा शोध घेण्यात आला आणि अनेक दिवसांपर्यंत नीरजच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती.
सात लाखांची सुपारी देऊन केली हत्या...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतपूरमधील हेमंत शर्मा याच्याशी ७ लाखांचा करार करण्यात आला. हेमंतने आपल्या चार साथीदारांसह हत्येची सुपारी घेतली. ३ जुलैच्या सायंकाळी ४.४५ वाजता नीरज आपल्या दिव्यांग मुलाला कोचिंगला सोडून घरी परतत होती. त्याचवेळी एका एसयुव्हीने तिला जोरदार धडक दिली.
एसयुव्हीने दिली धडक...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलैच्या सायंकाळी ४.४५ वाजता नीरजने आपल्या दिव्यांग मुलाला कोचिंग सोडून सोडून घरी परतत होती. तेव्हा जलद गतीने एसयुव्हीने त्याला जोरदार धडक दिली. पोलिसांनुसार, गाडी तब्बल १३० किलोमीटर प्रतितास वेगाने धावत होती. धडक इतकी भीषण होती की, नीरज तब्बल १०० फूट दूर जाऊन पडली आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर वाहन चालक तातडीने फरार झाला.
भावाच्या तक्रारीनंतर कट-कारस्थान उघड...
सुरुवातीला हे प्रकरण हिट अँड रनचं वाटत होतं. मात्र नीरज यांचा भाऊ राकेश शर्माने पोलिसांत तक्रार केली. यामध्ये त्यांनी बहिणीची हत्या झाल्याचं सांगितलं. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, नीरजने अनेकदा तिच्या हत्येचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. नीरज यांची मुलगी आयुषी, सासू आणि भाचा बलराम वारंवार त्यांच्या संपत्तीवरुन त्रास देत आहे.
नीरजने आपल्या भावाला सांगितलं होतं की, आयुषी अत्यंत हिंसक होत चालली आहे. संपत्तीवरुन तिच्यासोबत काहीही होऊ शकतं. शेवटी या अपघातानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल रेकॉर्ड तपासल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. आयुषीचे काका, कथित सुपारी किलर आणि त्याच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली आहे. तर काकाचा मुलगा बलराम अद्याप फरार आहे.