आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed Crime News : सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेनं लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणीकंद परिसरात घडली. ही घटना ताजी असतानाच बीडमध्येही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. बीडच्या माजलगाव तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांकडून 'तू काळी आहेस'असं म्हणत विवाहित महिलेचा छळ सुरु होता. सतत होणाऱ्या छळाला कंटाळून या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली.याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्योती पवार असं या महिलेचं नाव आहे.
लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत होते, पण..
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतीचा विवाह 2018 मध्ये माजलगाव तालुक्यातील तालखेड परिसरात असलेल्या तळतांडा येथील कृष्णा पवार यांच्याशी झाला होता.लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत होते.परंतु त्यानंतर सासरच्या मंडळींनी पतीच्या व्यवसायासाठी माहेरून पैसे आण असा तगादा लावत ज्योतीचा छळ केला.
नक्की वाचा >> दिवंगत अजित पवारांच्या जागेवर 23 एप्रिलला मतदान, राहुरी, बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर, निकाल कधी?
पुण्यात उपचारादरम्यान झाला महिलेचा मृत्यू
या छळाला कंटाळून ज्योतीने 12 जानेवारी 2026 रोजी विष प्राशन केले होते. त्यानंतर तिला छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, पुण्यात उपचारादरम्यान 18 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी 13 मार्च रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पती कृष्णा पवार, सासरा मनोहर पवार व सासू ताराबाई पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.