
लक्ष्मण सोळुंके, जालना: जनावरंची चोरी करणारी टोळी समजून चार व्यापाऱ्यांना ग्रामस्थांकडून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यातील दानवे जवखेड गावामध्ये घडला आहे. गावकऱ्यांनी व्यापाऱ्यांना बेदम मारहाण केली तसेच त्यांच्या दोन गाड्याही पेटवून दिल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, जनावर चोरणारी टोळी समजून चार जनावर खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना जबर मारहाण केल्याची संतापजनक घटना जालन्यातील जवखेडामध्ये घडली आहे. गावकऱ्यांनी व्यापाऱ्यांना चोर समजून त्यांच्या गाडीतील जनावरेही खाली उतरवली अन् गाड्याही पेटवून दिल्या. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास व्यापारी महिंद्रा पिकअप या दोन वाहनांमध्ये जनावरे घेऊन चालले होते. यावेळी जवखेडा दानवे गावामधील गावकऱ्यांना हे चोर असल्याचा संशय आला. याच संशयातून संतप्त गावकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवल्या. यावेळी गावकऱ्यांनी जनावरे खाली उतरवली तसेच व्यापाऱ्यांना जबर मारहाण केली आणि गाड्याही पेटवून दिल्या.
(नक्की वाचा- BLA Attack: बलूच लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानातील शहरावरच कब्जा, सरकारी कार्यालये ताब्यात)
या घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चार जणांना ताब्यात घेतले असता ते व्यापारी असल्याची माहिती समोर आली आहे. मारहाण झालेल्या व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून अज्ञात वीस ते पंचवीस जनाविरुद्ध व्यापाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी व त्यांची वाहने पेटून दिले प्रकरणी हसनाबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास हसनाबाद पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world