Kalyan News: पुण्यातील एका व्यावसायिकाला दोन लाख रुपयांच्या जादा नफ्याचे आमिष दाखवून कल्याणमध्ये बोलावून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका व्यावसायिकाला दोन लाख रुपयांच्या जादा नफ्याचे आमिष दाखवून कल्याणमध्ये बोलावून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोटा बदलून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या या टोळीचा कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे परिसरात खळबळ माजली होती, मात्र पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील वाघोली परिसरात राहणारे दीपक शिंदे हे इस्टेट एजंट म्हणून व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला आणि एक विचित्र पण फायद्याची ऑफर दिली. समोरच्या व्यक्तीने सांगितले की, तुम्ही आम्हाला 500 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात 5 लाख रुपये दिले, तर त्या बदल्यात आम्ही तुम्हाला 10, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात 7 लाख रुपये देऊ.
या व्यवहारात शिंदे यांना थेट 2 लाख रुपयांचा फायदा होणार होता. या अमिषाला बळी पडून शिंदे हे पैसे बदलून घेण्यासाठी तयार झाले आणि व्यवहार करण्यासाठी त्यांना कल्याणमध्ये बोलावण्यात आले.
( नक्की वाचा : Pune News : आधी चारित्र्यावर शिंतोडे, मग DNA चाचणी आणि अखेर अंगावर काटा आणणारा निकाल; 'या' प्रकरणाने सर्व हादरले )
फिल्मी स्टाईल लूट
ठरल्याप्रमाणे दीपक शिंदे हे 5 लाख रुपये घेऊन कल्याणमधील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनसमोर पोहोचले. ज्या व्यक्तीने त्यांना पैसे बदलून देण्याचे आश्वासन दिले होते, त्या व्यक्तीशी शिंदे यांची बातचीत सुरू होती. त्याच वेळी अचानक तिथे एक स्कार्पिओ गाडी येऊन थांबली. गाडीतून उतरलेल्या 3 ते 4 जणांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवले.
इकडे काय सुरू आहे अशी विचारणा करत त्यांनी नोटा बदलण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गाडीत टाकले आणि शिंदे यांच्या हातातील 5 लाख रुपयांची बॅग हिसकावून तिथून पळ काढला. आपण लुटले गेलो आहोत हे लक्षात येताच शिंदे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )
नाकाबंदी करून आरोपींना बेड्या
कोळसेवाडी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. ती स्कार्पिओ गाडी पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना सतर्क केले. सोमाटणे फाटा या टोलनाक्यावर पोलिसांनी सापळा रचून गाडी अडवली आणि सुरुवातीला संजय भोसले, गौशपाक शेख, सोमीनाथ गायकवाड आणि अरविंद जोजट या कल्याणमधील चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या गुन्ह्यातील इतर साथीदारांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी उल्हासनगर परिसरातून उमाशंकर पांडे, शरद मोहन, नरेश शर्मा आणि लक्ष्मण ऊर्फ प्रदीप धनवे या आणखी चार आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या या 8 आरोपींनी मिळून हा लुटीचा कट रचला होता. तोतया पोलीस बनून त्यांनी व्यापाऱ्याला गंडा घातला होता. या टोळीने आतापर्यंत अशाच पद्धतीने आणखी किती लोकांना लुबाडले आहे, याचा तपास आता कोळसेवाडी पोलीस करत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world